Tuesday, 27 September 2016

उदार कल्पतरू अर्थात सद्गुरू चरित्र ...भाग ४ ...

वंश वृक्ष 

डॉ.संत यांची वंशावळी 
मुक्काम - परानारोडी , पोस्ट - वडगाव 
व्हाया - मंचर , तालुके - खेड, जिल्हा - पुणे , महाराष्ट्र 





Friday, 23 September 2016

उदार कल्पतरू अर्थात सद्गुरू चरित्र ...भाग ३ ...

ll आरती सद्गुरूची ll 



विश्वात्मक सद्गुरू संत हा जाणा l
कलियुगी नारायण विज्ञानी राणा l
नेती नेती शब्दे न ये अनुमाना l
पराभक्ती विण न ये तो ध्याना ll१ll
जयदेव जयदेव जय सतगुरुनाथा  l
आरती ओवाळीतो तव पदी माथा  ll धृ ll

सबाह्य अंतरी निर्गुण हे तत्व l
अज्ञानी जनांसी न कळे ही मात l
आदी अनादी एकची तू ब्रम्ह l
व्यापक तू सर्वत्र नसे तुज अंत  ll२ll
जयदेव जयदेव जय सतगुरुनाथा l
आरती ओवाळीतो तव पदी माथा ll धृ ll

सतगुरु येउनी हो उभा ठाकला l
साष्टांगे प्रणिपात हा "भाऊ " ने केला l
शर्करा अधिष्ठान ठेउनी त्याला l
दिव्य चक्षु चा उपदेश हा केला  ll३ll
जयदेव जयदेव जय सतगुरुनाथा  l
आरती ओवाळीतो तव पदी माथा ll धृ ll

विश्वरूपाचे हो लागले ध्यान l
दिव्यचक्षुद्वारे बुद्धी उन्मन l
द्वैत भावाची झाली बोळवण l
सत्यवस्तू आहे ही सतगुरु जाण  ll४ll
जयदेव जयदेव जय सतगुरुनाथा  l
आरती ओवाळीतो तव पदी माथा ll धृ ll


दि.या. मार्डीकर
नागपूर 
ता : ३ - ८ - १९६८

(क्रमशः ) 


Saturday, 17 September 2016

उदार कल्पतरू अर्थात सद्गुरू चरित्र ...भाग २ ...

.....प्रस्तावना 

लेखक - दि.या. मार्डीकर 

      विश्वरूप परमात्म्याच्या कृपे करून आणि पूर्वसंचित व प्रारब्ध चांगले होते म्हणून माझा जन्म , योगीराज श्री बाबाजी महाराज माझे पितामह आणि पूर्वज श्री श्रीधरस्वामी यांच्या पुण्यशील नावाजलेल्या थोर घराण्यात या शतकाच्या आरम्भापुर्वी दोन महिने आधी रायगड संस्थानात झाला. माझे वडील श्री यादवराव मार्डीकर त्यावेळी या संस्थानाच्या दिवाण पदावर होते. माझ्या मातोश्रींचे नाव सौ राधिकाबाई होते. माझे आईवडील आचरणाने अत्यंत पवित्र, वर्तनाने धार्मिक , हृदयाने प्रेमळ तसेच दानशील उदार व सत्यप्रिय होते. वडील कर्मठ किंवा जातीपन्थाभिमानी नव्हते, कदापि कोणालाही ते कधीही अश्या वृत्तीत आढळले नाही. एकंदर आम्ही सहा भाऊ व पाच बहिणी असे आमचे मोठे कुटुंब होते. ह्यात मी आठवा होतो. वडील सेवानिवृत्त होऊन यांच्याकडे रहात असत. त्यावेळी मी हिस्लोप कॉलेज मध्ये विद्यार्थी होतो.
   
      मे १९२२ मध्ये माझं विवाह पूजनीय डॉ पी.एच. संत यांचे मामा कै.श्री वामनराव सुदुम्बरेकर यांच्या कन्येशी झाला. तिचे माहेरचे नाव सीता व सासरचे नाव सौ चंद्रिकाबाई आहे. हि गोष्टदेखील सद्गुरू प्रसादानेच घडून आली. मी व्यवसायानिमित्त नागपूर येथे राहत असे. १९४७ मध्ये मला सद्गुरुप्राप्ती होऊन प्रत्यक्ष आणि यथार्थ दर्शनाचा अलभ्य लाभ झाला व नंतर हळूहळू सद्गुरुकृपेने विज्ञानारूढ स्थिती प्राप्त झाली. माझे सद्गुरुस्थान म्हणजे परमपूजनीय डॉ सर्वांगानंद चैतन्य उपाख्य डॉ पी.एच.संत हे आहेत.
   
      अध्यात्म विज्ञान प्राप्ती नंतर अनेक प्रकारच्या भौतिक आपत्तीतून आम्हा उभायान्तांना आपला जीवन मार्ग क्रमवा लागला, हे सर्व विज्ञानी जन जाणतात. विशेष उल्लेख त्यांचा इथे करण्याची जरुरी भासत नाही. संत कवी श्री कबीरदासच्या खालील उक्तीनुसार आमचे रक्षण पालन व पोषण होत गेले....
दोहा :-         जाको राखे साईया मारन सीक है कोय l
                    बाल न बांका कर सके, जो जग बैरी होय ll
   
      हे सर्व सद्गुरूच्या कृपेचेच फळ आहे, असे आम्ही समजतो. परंतु ह्या सर्व जीवनात एक महान घात झाला. - म्हणजे आमचा एकुलता एक तरुण मुलगा १९५८ च्या एप्रिल मध्ये एकेकी दिवंगत झाला. पुत्राशोकाचे हे तीव्र दु:ख आता निवळले असले , तरी पण त्याची स्मृती कधी कधी असह्य होते. आम्ही उभयता विश्वरूप परमात्म्याची परम भक्तीने सर्वत्र यथाशक्ती यथामती सेवा करीत असतांना ही दुर्घटना आमच्या जीवनात का व्हावी , ही एक आधिभौतिक गूढ समस्या आहे. ती आम्हास कळली नाही.        असो.

      या प्रकारे भौतिकतेला न जुमानता आम्ही उभयतांनी १९४७ पासून ते आज पावतो अविरल भक्तीने नवं अवतार श्री भगवान मायानंद चैतन्य यांच्या गीता प्रणीत 'दिव्यदृष्टी ' सिद्धांताचा प्रचार व प्रसार करण्यात आपल्या जीवनातील उर्वरित काळ घालवीत आहोत. आम्हा उभयताचा वृद्धापकाळ आता जवळ आला आहे. पुढे काय होईल व जीवन प्रवाह पुढे कसा वाहू लागेल - ह्याचा काहीएक विचार न करता , सद्गुरूच्या प्रियत्वच्या आधाराने व सहाय्याने विश्वसेवा व्रत करीत आहोत व तशी काही वेळ आलीच तर विश्वर्पण होऊन ह्या महान व्रताची पूर्ती करू. परंतु आमचा मार्ग जरी कठीण असला तरी तो सद्गुरू कृपेने आमच्या अंतिम दशेपर्यंत सरळ होत जाईल , अशी आमची खात्री आहे.

      सद्गुरूच्या कृपेने १९५० नंतर अनेक ग्रंथ व कविता लिहिण्यात आल्या , त्याची यादी थोडक्यात खाली दिली आहे :-
१) इंग्रजी दिव्य दृष्टी  ( Divine Vision )
२) गीतायण (हिंदी )
३) गीत चंद्रिका
४) गीत मधु
५) गीत मालती
६) स्फुट काव्य
७) बुद्ध अवतार चरित्र
८) पुनर्जन्म मिमांसा
९) योग कसा करावा
१०) बुद्धीचे श्लोक
११) सुदर्शन (मराठी विज्ञानी नाटक )
१२) दासबोधातील वस्तू दर्शन
१३) विज्ञान गीता ( हिंदी संशोधीत )
१४) मधु स्मृती काव्य
१५) प्रतिमा पूजन
हिंदी, इंग्रजी व मराठीतून अनेक पुस्तके व लेख इत्यादी लिहिण्यात आले.

      हे कार्य होत असतांना , एके दिवशी असा भास निर्माण झाला की , आपल्या ह्या लेखन कार्यात काहीतरी फार मोठी उणीव आहे. हि उणीव धुंडाळण्याचा प्रयत्न करीत असतांना ता १८.०७.१९६८ ला रात्री एक कल्पना हृदयात उसळली , कि सद्गुरू चरित्रामृत आपल्या लेखणीतून उमटले पाहिजे. १९.०७.१९६७ ला हे मनोगत मी प्रथमतः सौ चंद्रिकाबाई यांस कळविले , त्यांनीही कुठलीच हरकत न घेता मला सांगितले कि, "सद्गुरू डॉ पुं.ह.संत यांचे संक्षिप्त जीवन चरित्र तुमच्या हस्ते अवश्य लिहिल्या गेले पाहिजे." संध्याकाळी आम्ही उभयता शंकरनगर येथे डॉ. संतांच्या बंगल्यावर गेलो आणि त्यांच्यासमोर विचार मांडून त्यांना नमस्कार केला. त्यांचे व माझे हृदय प्रेमाने भरून आले. आन्दाश्रू वाहू लागले व त्यांनी माझ्या मस्तकावर वरद हस्त ठेऊन, चरित्र लिहिण्याची अनुमती फार आढेवेढे घेऊन माझ्या हट्टामुळे नाईलाजाने दिली.



भगवान मायानंद चैतन्य नवं बुद्धावताराचा चरित्रलेखक - मी व परमपूजनीय सद्गुरू श्री स्वामी सिद्धाचार्य सर्वांगानंद चैतन्य उपाख्य श्री डॉ. पुं.ह.संत , ह्यांचा जीवन चरित्र लेखक बनण्याची पाळी माझ्यावरच आली. हेच आमचे उभयतांचे सौभाग्य मी समजतो. माझे चरित्र लेखन साहित्याच्या दृष्टीने कसेही असो, - ते साहित्यिकांनी पहात बसावे, मला त्याचे काहीच नाही, व साहित्य किंवा लेखन कलेशी माझं दांडगा परिचय नाही, साहित्य व लेखन माझे व्यासंग नाहीत. माझ्या लेखनकार्यात माझी सर्व भिस्त माझ्या परमदयाळू सद्गुरू माउलीच्या कृपेवरच आधारित असते. तेच लिहित असतात व त्यांनीच हे चरित्र लिहिले, असेच मी समजतो आणि आपल्या , माझ्यावरच्या निस्सीमकृपेमुळेच व प्रेमामुळे मला जीवनचरित्र लेखक उपाधी दिली, मी ते मोठ्या प्रेमाने सद्गुरुपायी आदराने लवलीन होऊन ग्रहण करीत आहे.

      सद्गुरूच्या आदेशाप्रमाणे , हे जीवनचरित्र अगदी साध्या मराठी भाषेतून लिहिण्यात आले आहे , कारण निरर्थक प्रशंसा , चमत्कारिक भाव , उदंड श्रद्धेचा देखावा , अलंकारिक परिभाषिक विश्लेषण , भावनांचा उमाळ , भरीव व बोजड शब्द, इ त्यांना पसंत नाही. ज्याप्रमाणे ते, प्रेमळ, रसाळ , साधेसुधे, उदार व कृपाशील आहेत , तितकेच त्यांचे चरित्रही साध्या शब्दयोगाने लिहिण्यात आले आहे. त्यांचे जीवन साधेपण व प्रेम ह्यांचा आदर्शच असल्यामुळे , ते साध्याच भाषेत प्रकट झाले आहे.

      परमपूजनीय सिद्धाचार्य श्री सर्वांगानंद चैतन्य , माजी संचालक , ओंकारेश्वर , जिल्हा निमाड, यांचे जीवनचरित्र लिहिण्याची सर्व सामुग्री , माझ्या विनंतीनुसार त्यांच्याचकडून मला प्राप्त झाली. याबद्दल मी सद्गुरूंचा ऋणी आहे. तसेच पूजनीय श्री प्रकाशानंद चैतन्य यांनी प्रास्ताविक लेख लिहून चरित्र , प्रकाशमय केल्याबद्दल त्यांचे मी हृदय्पुर्वक आभार मानतो. तसेच चरित्र छापण्यासाठी ज्या सज्जनांनी आर्थिक सहाय्य दिलेले आहे , त्यांचे उपकार आमच्यावर अनंत आहेत. ते फेडणे अशक्य असल्यामुळे , त्यांना मी सद्भावनेने नमन करतो.

      "मोल करो तलवार का, पडा रहन दो म्यान" या काव्य सिद्धांता प्रमाणे , वाचकांनी हे सद्गुरुचारित्र बोधामृत प्राशन करावे व ज्या उणीवा भासतील , त्याबद्दल क्षमतेची भावना मनात ठेवावी हि विनंती.

नागपूर                                                                                                                                 
१९६८                                                                                                                                          
(क्रमशः ) 
  
                      

Monday, 12 September 2016

उदार कल्पतरू अर्थात सद्गुरू चरित्र ...भाग १ ...

      मूल जन्माला आले आणि थोड्याच दिवसात त्याच्याकडून काहीही चांगल किंवा वाईट काम झाले कि, आपण नेहेमीच " बाळाचे पाय पाळण्यात दिसतात " हे वाक्य हमखास ऐकतो.

      माझ्या बाबतीत मी स्वतःला खरच भाग्यवान समजते कि नक्कीच कुठल्यातरी जन्माचे पुण्य आहे , ज्यामुळे मी श्री प्रकाश आणि सौ विशाखा जोशी च्या पोटी जन्म घेऊन श्री यशवंत आणि सौ सुनीला संत ह्यांच्या घरी त्यांचे धाकटे चिरंजीव राहुल ह्यांच्याशी लग्न करून आले. लहानपण माझं तस इतरांप्रमाणे चांगलेच होते. घरातली एकुलती एक मुलगी आणि लहान दोन भावंड आणि माझ्या पप्पांची मूळ घरापासून वेगळ्या शहरात नोकरीमुळे आमच छोटास कुटुंब. फक्त उन्हाळ्यात शाळेला सुट्टी मिळाली कि पुण्याला जायचे - म्हणजे पप्पांचे घर आणि काकाचे घर इतकीच माझी दुनिया !! माझे दादा ताई आणि इतर सग्गळी भावंडं हेच माझे जग !! घरी आलो कि मित्रमैत्रिणी फार नाही , पण ज्या होत्या त्यांच्यातच स्वतःला विसरून जायचे. घरी आई कायम देवाची पुस्तक वाचायची आणि मी स्वतः वाचायला शिकले , तेव्हा आईने सांगितल म्हणून , आवडीने ती देवाची पुस्तके वाचत होते. समजायचे काहीच नाही तर त्याची श्रेष्ठता कळणार कुठून ? सासरी आल्यावर , इकडेसुद्धा सासूबाई सर्वच सणवार करायच्या . जस आईकडे पाहिल तसच इकडेपण , त्या सांगत आणि घरातली परंपरा म्हणून देवावर विश्वास ठेवत होते इतकच.

     मात्र २००७ हे माझ्या वैयक्तिक आयुष्याला वळण देणारे वर्ष ठरले !! डॉक्टर अनिरुध्द (बापू ) धैर्यधर जोशी ह्यांच्या कडे आकर्षित झालो आणि खरोखर जीवन जगणे म्हणजे काय हे शिकायला लागले !! त्यामुळे अध्यात्मिक गोडी वाढीस लागली आणि बघता बघता मी बापुमय केव्हा होऊन गेले समजलच नाही. "आपल्या पूर्वसंचिता मुळे आपल्या ह्या जीवनात म्हणजेच मानवी जीवनात अनेक सुख-दु:ख , संकट छोट्या मोठ्या प्रमाणावर अचानक येऊन धडकतात आणि अर्थातच त्यातून आपल अख्खं अस्तित्व पणाला लागतं.मात्र एक चांगली गोष्टसुद्धा घडते, कि आपण ह्या दरम्यान आजूबाजूचे  व्यक्तीमत्व शिकायला लागतो. आणि जर आपल नशीब खरोखर बलवान असेल आणि आपण सद्गुरू चरणी लीन असू तर मात्र ह्या सर्व गोष्टी घडतातच , पण आपल्याला त्याची झळ पोहोचत नाही. फक्त संकट पेलायची जेवढी आपली स्वतःची ताकत असते , तेवढयाच वजनाचे संकट आपल्यावर येते आणि तरीसुद्धा आपण सहज हसत खेळत त्यातून निघून जातो. आणि संकट येऊ नये म्हणून मी स्वतः कसे जगायचे आहे ह्याची शिकवण मला माझे सद्गुरू वारंवार देत राहतात."

      वाचनाची आवड होतीच पण आता मात्र , हळूहळू मी अध्यात्मिक वाचन करायला सुरुवात केली आणि अचानक एके दिवशी माझ्या आईंनी त्यांच्या सासर्यांची - म्हणजे , माझ्या आजे सासर्यांची काही अध्यात्मिक पुस्तके वाचायला दिली. माझे आजे सासरे - डॉ. पुंडलिक हरी संत ह्यांच्यावर आचार्य दिनकरराव यादवराव मार्डीकर ह्यांनी माझे आजे सासरे ह्यांच्यावर सद्गुरू चरित्र लिहिलं. डॉ. पुंडलिक हरी संत म्हणजे नक्की कोण आणि ते सद्गुरू कसे झाले हेच आपण पुढे पाहणार आहोत.

      आणि तेच आज मी इथे लिहिणार आहे जे आचार्य दि.या.मार्डीकरांनी लिहून ठेवलय. शब्दशः तेच आहे फक्त ह्या ब्लॉगद्वारे आपण सगळेच वाचणार आहोत. माझ्यासाठी तर हा एक अनमोल ठेवा मिळालाय - कारण सुख फक्त पैशातच नसत हो  - जरी आज पैशावरच दुनिया चालते आहे. म्हणजे पैसा असेल तरच तुम्हाला मान सन्मान आहे नाहीतर तुमचे अस्तित्व कवडीमोलाचे सुद्धा राहत नाही. पण आज मी ठणकावून सांगू शकते कि , "हो, माझे कुटुंब म्हणजे - आम्ही दोघ आणि आमची २ मुलं नक्कीच भाग्यवान आहोत , कारण आमच्या पाठीशीच नाही , तर चहु बाजूंनी आमच्या सद्गुरूचे हस्त आमच्या भोवती श्वासागणिक आहेतच. आणि म्हणूनच आम्ही सुखी समाधानी जीवन जगतोय." त्यामुळे जेव्हा मी हे उदार कल्पतरू वाचले तेव्हा सर्वच श्रद्धावानांना ह्याचा लाभ व्हावा म्हणून ह्या डीजिटल डायरिमार्फत लिहायला सुरु करते आहे.

      अर्थातच ह्याची प्रेरणा मला माझ्या सद्गुरूचीच आहे हे मी मनोमन मानतेच . कारण येवढ सग्गळ करून घेणारे फक्त तेच आहेत.
" मी तो केवळ निमित्तमात्र, करता करविता माझे सद्गुरू च. म्हणूनच हे सर्व त्यांच्या चरणी अर्पण करते आहे."

      आता ह्यापुढे आपण आचार्य दि या मार्डीकरांनी स्वतः लिहिलेले - "उदार कल्पतरू अर्थात सद्गुरुचारित्र" वाचणार आहोत, वेगवेगळ्या भागांमध्ये ......

(क्रमश:)

Tuesday, 6 September 2016

बदल !! .... भाग २ .....

      ४० वर्षांपूर्वी आमच्या नाशिकच्या महात्मा गांधी रोड वर दुतर्फा झाडी होती , इतकी कि सूर्य किरण सुद्धा क्वचितच पडायचे त्या रस्त्यांवर. कालांतराने मात्र त्याच ठिकाणी संपूर्ण concrete जंगल झालय. आज प्रत्येक गावात शहरात आपण हीच परिस्थिती बघत आहोत. मानव शहाणा झाला आणि त्याची उत्पत्ती वाढत गेली , त्याच प्रमाणे त्याच्या गरजा वाढत आहेत आणि त्यासाठी - त्या पूर्ण करण्यासाठी त्याने निसर्गावर घाव घालायला सुरुवात केली. मुंबई सारख्या शहरांमध्ये नदी किनार्यांवर भर घालून वस्त्या उभ्या राहिल्या आणि त्याचीच आज छोटी छोटी उपनगर झालीत.

      मानवी गरजा पूर्ण करण्यासाठी , माणूस विविध उपाय शोधत गेला आणि त्यातूनच उद्योग धंदे उदयास येऊन छोट्या मोठ्या कारखान्यांची उभारणी झाली. कारखान्यातला विषारी धूर आकाशात आणि सांडपाणी जवळच्याच नदी नाल्यात सोडले गेल्यामुळे - पाण्यातील  (समुद्री) प्राण्यांचा जीव धोक्यात आला  शिवाय कारखाने आणि इमारती वाढल्यामुळे आपोआपच पर्यावरणाचा तोल ढासळत गेला आणि निसर्गाचा कोप वाढतीस लागला. कारखाने व इमारती बांधण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील झाडांचे कत्तल करण्यात आले. विषारी धुरामुळे आणि झाडांवर झालेल्या अतिक्रमणामुळे वन्य जीवाचे प्राण धोक्यात आले. पक्षी प्राण्यांच्या अनेक जाती आज लुप्त झाल्यात नामशेष झाल्या आहेत - केवळ आणि केवळ मानवाच्या प्रगती पायी.

      गावातला माणूस शिकून नौकरी निम्मिताने शहरांकडे वळू लागला. शेतीकडे पाठ फिरवू लागला कारण शेतमालाला हवा तसा प्रतिसाद मिळेनासा झाला . ज्यामुळे बळीराजाची नवी पिढी शहरांकडे धाव घेते आहे. त्यामुळे त्याचे income वाढत गेले तश्या गरजा हि वाढल्या. सगळ्याच एकमेकांना पूरक अश्या गरजा हातात हात घालून माणसासमोर उभ्या राहिल्या.  

      कुटुंब वाढल्यामुळे छोटी घर लहान पडू लागली आणि त्यासाठी मोठ्या इमारती उभ्या राहिल्या. माणसाचे status आजच्या काळात महत्वाचे ठरू लागले आणि हेसुद्धा एक कारण बनले - एकत्रकूटुंब पद्धतींना तडा जाण्यासाठी व आता तर "छोटी कुटुंबे -घरे मोठ्ठी " असे समीकरण झाले. (अपवाद )

      शाळांमध्ये पाटीची जागा अवजड दप्तरांनी घेतली नि बालक वर्ग नवनवीन स्पर्धांत उतरून अवकाश गाठू लागला, मात्र पालकवर्गाच्या सुप्त इच्छेची जागा क्वचित न पेलवणाऱ्या आकांक्षानी घेतली आणि कोवळया वयातच लहान मुले शाळेत जाऊ लागली. (अपवाद)

      पुस्तक वाचनाची आवड आता संगणकाने घेतली आणि शाळा कॉलेजचे प्रोजेक्ट्स / गृहपाठ करण्यासाठी विद्यार्थी पूर्णपणे संगणकावर दिसू लागले. वेळ कमी व अभ्यास जास्तं - ह्यामुळे मोकळ्या हवेत बाहेर पडणे जणू बंदच झाले आणि मैदाने ओस पडू लागली. अवेळी खाण्याच्या सवयींमुळे आपोआपच शरीरावर नकारात्मक परिणाम पडू लागला. छोट्या घरांमध्ये पालक घरात नसल्यामुळे जेवणाचे हाल होऊ लागले , बाहेरील खाणे वाढून त्यामुळे साहजिकच शरीर आणि मनांवर परिणाम होऊ लागले. (अपवाद)

      पूर्वी एखाद्या घरी पंखा किंवा फोन असला तरी ते घर - समृद्ध समजले जाई. मात्र आज तंत्रज्ञान इतके पुढे गेले आहे कि बहुतेक ठिकाणी म्हणजे ऑफीस किंवा घरीसुद्धा पंख्याची जागा air conditioner  ने घेतली आहे आणि दूरध्वनीची जागा मोबाईल फोन ने घेतली. स्वहस्ते करायच्या कामांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाच्या वस्तू घरात आल्या आणि घरातील स्त्रीसाठी मोठ्ठी मदत झाली. कारण एकल कुटुंबासाठी असो वा उच्चशिक्षण घेतल्यामुळे - आज स्त्रीदेखील घरच्या वाढत्या खर्चांना सामोरे जाण्यासाठी नोकरी निमित्त बाहेर पडली , ज्यामुळे तिला ह्या नवीन वस्तूंचा खूपच फायदा झाला.

      आधुनिक तंत्रज्ञानामुळे मात्र आपण घरातील सुख समाधान हरवून बसलो.माणूस जास्तच तंत्रज्ञानात गुरफटला गेला आणि एकलकोंडा झाला. कधी काळी इमारतींमधील सतत उघडे राहणारे दरवाजे आता क्वचितच उघडतात. आपल्या शेजारी कोण राहत , हे देखील आता कळत नाहीये किंवा आपण त्यात रस घेत नाही आहोत. "मी बरा आणि माझे काम -माझे घरकुल बरे" अशी परिस्थिती आज पाहतोय आपण, इतरांशी संवाद कमी झाला. कोत्या मनाचे झालोत आपण. प्रत्येकाकडे किंवा स्वत:च्या जीवनाकडे पाहण्याची नजर आज बदलली आहे !!

      तसेच काळानुसार व मागणीनुसार वाहतुकी मध्ये सुद्धा अनेक बदल झाले.आधी फक्त सायकल असणे म्हणजे श्रीमंताचे लक्षण मानले जाई  मोठमोठे वकील ,प्राध्यापक ,डॉक्टरसुद्धा कमीपणा न वाटता सायकल वापरत. हळूहळू  चारचाकी वाहने आली आणि माणसाने आज आकाश जमीन आणि पाण्यावर चालणार्या वाहनांचा शोध लावला . ज्यामुळे आज केवळ माणूसच नाही तर त्याच्या गरजा पूर्ण करणाऱ्या प्रत्येक वस्तू ह्या तिन्ही मार्गांवरून थेट त्याच्या घरी पोहोचत आहेत .

     काळानुसार मानवाची विचारधारा बदलत गेली आणि समृद्ध देश करण्याच्या हेतू ने राजकीय पक्षांची रेलचेल सुरु झाली. राजकारणाच्या नावाखाली एकमेकांवर कुरघोडीची सुरुवात झाली. मात्र ह्यात सामान्य मानव भरडला जाऊ लागला. श्रीमंत अधिक श्रीमंत होऊ लागले आणि गरीब मात्र आणखीनच तळाला जाऊ लागला.
      शास्त्र व तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणावर प्रगती करू लागले आणि माणूस मात्र माणुसकी हरवून बसला.
पूर्वीच्या काळी , म्हणजे अगदी १९९० पर्यंतच्या पिढीत मोठ्यांबद्दल धाक होता. आपल्या वयापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी आदर होता, माणूस माणसाला समजून घेई, लोकं मोठ्या मनाचे होते.

      आज मात्र खरच सग्गळच बदललंय !! बदल - परिवर्तन पाहिजेच आहे - मात्र माणसाला माणसापासून तोडणारे परिवर्तन काय कामाचे हो !!??!!

समाप्त