Friday 19 August 2016

!! बदल !!

      " ए ताई , अग बदल ना ग ते रटाळ सिरिअल !! किती गुंतली आहेस त्यात , उगीचच काहीही पहात असतेस नि खरं मानून जगतेस !!" सुदीपचा आवाज आता चढला होता. भानावर येत सुमा ने channel बदलले आणि आपल्या कामात परत दंग झाली. आता TVवर गाणी लागली होती, आवडीचे बोल कानावर पडताच , सुमा परत त्या चालीन्वर गुणगुणायला लागली आणि घरात छानसे वातावरण निर्माण  झाले. !
      म्हणजे पहा !! फक्त एक बटण दाबल्याने माणसाचा "मूड" लग्गेच बदलतो ! इतका सहज बदल जीवनात घडला तर किती छान होईल न!!

      " बदल - change - परिवर्तन - क्रांती  "

      आज प्रत्येक बाबतीत आपल्याला बदल पाहिजेच आहे - त्याच त्या वातावरणातून / मनःस्थितीतून / कामातून / दैनंदिनी मध्ये / कपड्यामध्ये / अभ्यासात --- हरेक गोष्टीत बदल पाहिजेच !!! का ?? - तर फ्रेश वाटावं - ताजेतवाने वाटावे - थोडास हटके वाटाव - मनःस्थिती बदलावी म्हंणून .
     हेच पहा न आता ह्या "बदलाची" रूपे !!
लहान मुल जसजस वाढायला लागतं तसे त्यांच्यात अनेक बदल जाणवायला लागतात आणि मुख्य म्हणजे ह्या प्रत्येक बदलाचे कौतुक असते ! विशेषतः घरातली आजी -आजोबा झालेली जोडपी खूपच कौतुक करतात आणि "ह्या गोड कौतुकात आपल्या मुलांच्या लहानपणीचे क्षण आठवून त्यात रमून जातात." घरातल्या खेळकर हसर्या वातावरणाचे मुख्य कारण - हीच लहान बाळे असतात! म्हणजे अनेक वेळा आपण ऐकतोसुद्धा कि , " पाळणा हालला आणि आमच्या घरातले वातावरणच पार बदलून गेले "!!
      मुलांचे वय वाढत जाते तसे आजूबाजूच्या परिस्थितीप्रमाणे त्यांच्यातही बदल होत जातात आणि त्यांच्यातल्या ह्या विविध बदलांमुळे परिवारातील / घरातल्या इतर मंडळींवर अनेक बदल घडत जातात. मुल बाहेर पडायला लागतात. शाळा, कॉलेज, नौकरी मध्ये विविध वृतींच्या सहवासात येतात आणि ह्यामुळे देखील आपल्याला मुलांच्या वागण्या बोलण्यात बदल जाणवू लागतात. काही चांगलेच असतात, पण कधी कधी काही वाईट बदलही घडतात ज्यांना बदलता बदलता आपल्याला नाकी नऊ येतात !! आणि हे नकोसे बदल घडवताना मुलांच्या मनाची तर खूपच काळजी घ्यावीच लागते. कधी कधी अनपेक्षितपणे काही बदल असे समोर येतात कि , खरच आश्चर्य वाटतं....."एवढ्या लहान वयातल्या मनावर ह्या लाखो बदलांचे किती परिणाम होत असतील !!आणि प्रत्येकातून जाण्यास मन बदलू नये म्हंणून हृदयाला किती प्रयास करावे लागत असतील !!
      खोडकरपणा फारच वाढला कि शाळेतही वर्ग बदलावे लागतात , कारण त्यामुळे इतर मुलांवर त्याचा नकळत परिणाम होऊ नये . घरचे कपडे वेगळे, शाळेतले रोजचे uniform वेगळे नि स्पोर्ट्स डे वगैरे special periods साठी चे वेगळे कपडे - तेही सतत बदलावेच लागतात !! आणि ह्यातही गम्मत असतेच की!! बघा -- uniform मध्ये असतांना शिक्षकसुद्धा आपल्या विद्यार्थ्यांना पटकन ओळखतात , पण एरव्ही बाहेर कुठे भेटले तर लक्षातच येत नाहीत त्यांना "आपलीच मुले"!!
      तोच तो अभ्यास नको म्हणून PT चित्रकला सारखे विषयसुद्धा शाळेत शिकवले जातात, ज्यातून विद्यार्थ्यांची मानसिकता बदलून बौद्धिक व शारीरिक वाढीस मदतच होते. आणि लहान वयात मूड्स सतत बदलत असतात , ह्या मुलांचे !! हे मूड्स सांभाळता सांभाळता पालकांची पळताभुई थोडी होते !! शिवाय ह्यांची मित्र मंडळी सुद्धा ह्याच वयात बदलते ! फरमाईश / मागण्या बदलत राहतात ..."मग त्याने अस घेतल , ते माझ्यापेक्षा चांगलच आहे , मलापण तेच पाहिजे ...!" कि झाल ...घरातल वातावरण बदललं !!! आजी आजोबा समजावण्यात गर्क , ताई दादा चिडवण्यात आणि आई बाबाच्या  कपाळावर चिंतेच्या आठ्या !! "आण्याची कुठून हि वस्तू - जी आपल्या देशातच उपलब्ध नाहीये !!!!!!!"
      असे हे बालपणाचे - मस्ती हट्टीपणात गेलेले दिवस मात्र परत कध्धीच येत नाहीत , हेही तितकेच खरे !
वय वाढल कि मुलांच्या सवयी , विचारशक्ती, बौद्धिक पातळी --सर्वच बदलत जातं. मुलं जबाबदारीने वागायला लागतात . काही शारीरिक बदलदेखील होत असतात, आणि एकूणच ह्या सर्व परिवर्तनाला मुले हिमतीने सामोरे जातात !
      त्यातही घरातच वेगवेगळ्या field / faculty मधले लोक असले कि त्यांच्या वर्तणुकीचासुद्धा मुलांवर अनेक प्रकारे परिणाम करतात , नि तसेच बदल त्यांच्यात दिसायला लागतात. जसे - सुरुवातीला कदाचित मुलांमध्ये गायकी ,नृत्य ,वाचन ,चित्रकला ,खेळ ,क्रीडा ... विविध क्षेत्रे जसे समाजकार्य ,राजकारण इत्यादी मिळते.., "असच करावसं वाटत ... काही मुद्दाम ठरवून केलेलं नाहीये ..."
      समोरच्या व्यक्तीचे हावभावसुद्धा आपल्या वागण्यात परिवर्तन आणतात. वाढत्या वयातल्या शारीरिक व मानसिक परीवार्तानांमुळे तर मुलांवर, विशेषतः ह्या तरुण पिढीला फारच जपावे लागते, कारण आता त्यांच्या स्वतःच्या वैचारिक पातळींवर अनेक बदल घडत असतात !सभोवतालच्या परिस्थितीशी जास्तीत जास्त जुळवून घेण्याचा प्रयास करता करता अनेक मानसिक परिवर्तन दिसायला लागतात. जसे - घरात अचानक काही निर्णय जबाबदारीने घ्यायला लागतात, घरगुती समस्यांवर आपले मत प्रदर्शन करतात, आणि हळूहळू बाहेरील वातावरणातसुद्धा रमायला लागतात. हिरीरीने सहभागी होतात.
      आणि ह्यातूनच त्यांच्या भविष्याच्या योजना बनायला सुरुवात होते ....

( क्रमशः)              

Thursday 11 August 2016

.....श्रीमती सुनीला यशवंत संत ....भाग ३

      

"आमच्या सासूबाई "

श्रीमती सुनीला यशवंत संत 

भाग ३ ...

      त्यातही सुनांचे कौतुक जरा जास्तच !! मला तर सुरुवातीला नीट स्वयंपाकदेखील येत नव्हता. माझ्या आईने पुष्कळ प्रयत्न केले होते सर्व शिकवण्याचे , पण मलाच तितकासा रस नव्हताच ह्या गोष्टीत.  आणि इकडे आईंनी तीच जबाबदारी परत पार पाडली. मला अनेक पदार्थ बनवायला शिकवले. कालाकुसारीतला 'क' न जाणणारी मी, आज स्वतः विणकाम , भरतकाम , सिरामिक painting एम्बोसीन्ग करू शकते. त्यांनीच मला शिलाई मशिन चालवायला शिकवले.
      सांगण्याचा हेतू असा कि - काहीच येत नसतानासुद्धा त्यांनी मला " हेच येत नाही - तेच येत नाही.." असे टोमणे मारत न बसता सर्वकाही स्वताहून शिकवले.
      आजही आई आठवल्या कि फक्त त्यांच्या  स्मितहास्यतच आठवतात. सध्या त्या पुणेकर आहेत. पण, त्याना सारखे दोन्ही घरे एकत्रच रहावीत असेच वाटते. पण मग आज तशी परिस्थिती नाही. प्रत्येकाचे आपापले काम धंदे आहेत , म्हणून मग त्या स्वतःच adjust करतात. मग एक पाय पुण्यात - एक नाशकात अशी त्यांची द्विधा मनस्थिती होते.
      आजही त्यांचा फोने आला कि , राहुल मला म्हणतात , " तुझ्या मैत्रिणीचा फोने आहे" आणि हे नवीन नाते आम्ही दोघींनीही जपले आहे. त्यान्नासुद्धा मज्जा वाटते.
      माझ्या मैत्रिणी तर माझं हेवा करतात. " माझी सासू तर नाही --अशी...!!" असे बोलून मोकळ्या!! मग मीच म्हणते , " नशीब लागतं!"
       खरच नशीब लागत नाही का , अशा व्यक्तींचा सहवास आपल्याला मिळायला !!! ज्यांना फक्त ओसंडून प्रेम देणेच माहित, कोणाच्याही उणीवा काढत न बसता - त्याचा आहे तसा स्वीकार करणे. - अवघड आहे , पण माझ्या सासुबाईंनी ह्या सर्वावर मात केलीये ! ह्याचे साक्षीदार आम्ही आहोतच की !! फक्त एकच खंत राहते - आज आमचे बाबा पाहिजे होते ....
      पण दैवापुढे कुणाचेही चालत नाही हेच खरे ! आता तुम्ही म्हणाल कि , " हे तर चांगलेच सांगताय त्यांच्याबद्दल. काहीतरी कुठेतरी उणीवा असतीलच की..!!"
      पण एक सांगू ? मला तर गेल्या २८ वर्षात त्यांच्यात उणीवा काढण्यासारख काहीच दिसलच नाही, ह्या वयात सुद्धा (८० ) आपल्याकडून कोणी दुखावले जाऊ नये , आपण (मी) - माझ्यामुळे इतरांचा काही फायदा करून देऊ शकते का ? नवीन ..पुढे काय ? मी शिकेन, बाकीच्यांना शिकवेन ...त्यांच्या समवयस्क मैत्रिणीसुद्धा त्यांना म्हणतात , " कशा हो संतवहिनी तुम्ही सर्व करता ? सुनांच कौतुक ...येवढ !!!???!!!
      सध्या त्या पुण्यात आहेत ,पण तिथेही शांती नाही, त्यांच्या सोसायटीच्या entertainment commitee च्या , आई Head आहेत. गणपती उत्सवात त्याच सर्व आखणी - मांडणी इतरांच्या सहाय्याने करतात मग त्यात - लहानमोठ्यांसाठी खेळ , entertainment programs, - ह्यासर्वांसाठी लागणारी वर्गणी बक्षिसं {इतर मेम्बेर्स आहेत मदतीला - पण प्रत्येकाला मदत लागते आईन्चीच !!} सोसायटीतल्या बायकांना एकत्र आणून मासिक 'भिशी' सुरु केली. पण त्यात इकडच्या तिकडच्या गप्पा - नवीन कोण काय शिकू शकते - मग तो एखादा पाककलेच पदार्थ असो वा एखादी कलाकुसर वा एखाद्या व्यक्तीचे जीवनोपयोगी मार्गदर्शनपर छोटेसे भाषण !
      आताशा त्या जरा थकल्या आहेत , पण तरतरीत - कायम ताजेतवाने - चेहेर्यावर दुखण्याचा लवलेशही नाही . गुढघ्याच्या , पोटाच्या दुखण्यामुळे एक नवीन मैत्रीण मिळाली आहे - त्यांची काठी ! पण त्यामुळे त्यांचे फिरणे बंद झाले नाही. जमेल तेवढे करतच असतात. " बसून काय करू?" हा त्यांचा प्रश्न. आपण उत्तर दिल.." जरा आराम करा .." तर त्यावर त्यांचा प्रतिप्रश्न / उत्तर " आराम तर चालूच आहे . दुसरं काहीतरी अजून करते." आणि शिवाय गेले अनेक वर्ष त्यांचे  लहान बाळांसाठी sweater सेटचे (sweater मोजे टोपी ) विणकाम आजही सुरूच आहे. काही sweaters त्या गिफ्ट म्हणून देतात, तर काही आमच्या सद्गुरू डॉक्टर अनिरुद्ध (बापू) जोशीच्या "माये ची ऊब " च्या कलामांतर्गत दान करतात.
      नातवंडाचे भारी कौतुक. नेहेमी नवीन काही बाजारात दिसल, कि ह्या आधी आपल्या नातवंडाना देणार . प्रत्येक वस्तू २-२ च्या हिशोबाने - २ नाती - २ नातू अशी वस्तू घेणार, तिचे महत्व सांगणार आणि "परत हरवले तर देणार नाही " हेसुद्धा सांगणार आणि खरोखरच मुलांनी ते हरवले / तोडले तर त्या, त्यांनासुद्धा शिक्षा करतात. हे सारे असते ते , त्यांना वस्तूंची किंमत / महत्व कळावे म्हणून.
      आमच्याकडे गणपती - गौरी आणि अश्विन नवरात्र हे दोन सण असतात. ह्यातही चौघा नातवंडांना हाताशी घेऊन त्यांना प्रत्येक काम शिकवतात. अगदी दरवर्षी तेच काम असते पण त्याचे महत्व लक्षात राहावे म्हणून दरवेळी वेगवेगळ्या पद्धतींनी त्याचा अर्थ समजावून सांगून करवून घेतात - मग काय चौघेही आनंदाने तयार!
कुठे गावाला जातांना , न चुकता तिथल्या नातेवाइकासाठी आवर्जून काहीतरी भेटवस्तू घेऊन जातातच आणि मुख्य म्हणजे ज्यांना देतात त्यांना तर फार आवडतातदेखील.
      आजच्या नवीन technology सुद्धा त्या शिकल्या आहेत. कॉम्पुटर वर जमेल तेव्हा नवीन माहिती घेण्याचा प्रयत्न सुरूच असतो. आणि सुमा ने तिच्या नौकरी निमित्त लाडक्या सूनुआज्जीला मोबाईल भेट दिला आहे. त्यावर आज त्या आम्हा सर्वांशी whatsapp द्वारे सुद्धा गप्पा मारतात.
      आम्हा सर्वांचा वाढदिवस - लग्नाचा / व्यक्तिगत ह्यांच्या लक्षात. प्रत्येकाला काही न काहीतरी देणारच. " आई , कशाला आता " असे म्हणले कि म्हणतात, " राहू दे ग, माझी आठवण. जास्त काही करू शकत नाही, " आम्ही जर दूर असलो , प्रत्यक्ष भेटीत आठवणीने " हे तुझ्या वाढदिवसाचे गिफ्ट " असे सांगून देणारच . त्यांच्या मित्र-मैत्रिणींना न विसरता शुभेच्छाचा फोने करणार, आणि तेसुद्धा आतुरतेने संतवहिनींच्या फोने ची वाट पाहत असतात.
      आम्हा सुनांना तर कधी जाणवूच दिल नाही कि, त्या आमच्या सासू आहेत. कायम आईच्याच मायेने वागवलं. आणि खरोखर त्या जवळ असल्या कि आईची कमी जाणवतच नाही, त्यांना त्यांची मुलं जवळ पाहिजे असतात. म्हणजे मोकळेपणाने गप्पा मारता येतात. कोण कुठे काय करतय याची सर्व तपशील असते.
      " जुन्या-नव्या पिढीत त्यांनी स्वतःला समावून घेतलंय. इतरांनी आपल्याशीच तडजोड करायची  का ?आपणच जरा व्यवस्थित वागलो /राहिलो तर आत्ताचा जो generation gap वर ओरडा -आरडा , ही तफावत जी जाणवते दोन पिढ्यांमध्ये - ती जाणवणारच नाही " ही त्यांची समजूत. फक्त वरवर नाही ,तर त्या स्वतः त्याप्रमाणे जगल्यादेखील आहेत.
      त्यांनासुद्धा कुणी सासू आपल्या सुनेशी नीट वागत नसेल तर वाईट वाटते. "सासुपणाचा हेका कशासाठी ? हे त्यांना कळत नाही.
      मी आणि नीता - ह्या त्यांच्या पोटच्या मुली नाही तर सुना आहोत, - पण आज त्यांच्यासमोर आम्ही सांगू इच्छीतो कि , "त्या आमच्या सासू या नात्याने आमच्याशी कधीच वागल्या नाहीत . सदैव आमच्या आई च राहिल्या ! मैत्रीण बनून राहिल्या ! आजही मला काही अडचण असल्यास मी आधी त्यांचा सल्ला घेते. "माझ्या सासूला मी कशी विचारू ?" हा असा प्रश्न मला कधीच पडला नाही,
      आपण जगाच्या बरोबरच राहिला पाहिजे, म्हणून आम्हाला सुद्धा सतत प्रेरणा देत असतात.

      सध्या ,सासू सुन - संबंधावर जे ताशेरे ओढले जातात त्याने सुद्धा आई दुखी होतात. आणि त्याला जबाबदार आपणच आहोत हेदेखील तितक्याच सहजपणे कबूल करतात. मात्र , माझ्या सासूबाई कश्या आहेत - हे सर्वांना माहित असाव म्हणून हा लेख प्रपंच !!
      आणि प्रत्येक मुलगी कधीतरी ह्या पदावर येणारच आहे, तरी तिने स्वतःला नवीन घरात समावून कसे घ्यावे ह्यासाठी आमच्या आई - श्रीमती सुनीला संत यांचा आदर्श नक्कीच घेता येईल .. हो न ? कारण शेवटी घर जरी दोघांच असल तरी , घरातल्या स्त्रियांच्या आपसी संबंधावारच घराचे घरपण टिकून असते नाही का !!??!!
   
      तर, आता तुम्हीच सांगा - अशी सासू मिळायला भाग्यच लागत !!!!!

टीप :- हा लेख २००४ साली लिहिला आहे, पण काळानुसार त्यात काही बदल केले आहेत.

 {समाप्त} 

  

Wednesday 3 August 2016

.........श्रीमती सुनीला यशवंत संत ........ भाग २


"आमच्या सासूबाई "

श्रीमती सुनीला यशवंत संत 

भाग २ .....

      तसेच करमरकरांच्या आधी त्यांच्याच flatमध्ये एक जोडपे रहात होते. एकदा ते मालक ऑफिसला गेले असता त्या बाईंना काहीतरी जोरात कापले (पोटाच्या खाली ) व त्या जोरजोरात ओरडायला लागल्या. राहुलने त्यांना विचारल्यावर , "तुमच्या आईंना लग्गेच पाठवता का ?" असे विचारले . आई तिथे गेल्यावर त्यांच्या लक्षात आले कि त्या बाईंना लग्गेच दवाखान्यात न्यावे लागेल. कारण continuously रक्तस्त्राव होत होता. आईंनी ताबडतोब त्यांना उचलले आणि रिक्षेतून दवाखान्यात घेऊन गेल्या. ती जखम इतकी सेरियस होती कि डॉक्टरांनी ताबडतोब एक छोटेशी शस्त्रक्रिया करून रक्तस्त्राव थांबवला. तेवढया वेळात त्यांच्या Mrना फोने करून बोलावून घेतले. ते आल्या आल्या आईवरच खूप चिडले. "शस्त्रक्रिया करण्या अगोदर मला का नाही बोलावले?" वगैरे .... आईंनी त्यांचे सर्व बोलणे ऐकून घेतले व त्यांना खरी खोटी सुनावून त्या म्हणाल्या, " आम्ही दवाखान्यात आलो तेव्हा परिस्थिती बघूनच Drनी ताबडतोब शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. आणि त्यांना आपल्यापेक्षा जास्त कळत. ते डॉक्टर आहेत कि तुम्ही ?" नंतर काही वेळाने त्या माणसाचा राग शांत झाला व त्यांनी आईची माफी मागितली.
      अतुल - राहुल लहान असतांना "रमेश " नावाचा १४-१५ वय वर्षाचा मुलगा त्यांच्याबरोबर राहायचा. घरातली छोटी मोठी कामे करत असे. पण आई बाबांनी त्याला कधी परके समजलेच नाही. आपलाच तिसरा मुलगा म्हणून त्यालाही चांगल्या मार्गाला लावले. लग्नाचे वय झाले असता - चांगल्या घरातली मुलगी बघून त्याचे लग्न ह्यांनीच लावले व संसारही मांडून दिला. आजही रमेशदादा आईंना न चुकता भेटायला येतात. आम्ही तर त्यांना मोठ्या भावासारखाच मान देतो.
      अतुल - राहुल १२वी - १०वीत असतानाची गोष्ट. आई काही कामानिमित्त काही ओळखीच्यासह (नरेंद्र देशपांडे व इतर ) मुंबईला गेल्या होत्या. काम झाल्यावर बस स्थानकावर येताना एक गाडी चुकीच्या बाजूने overtake करत आली आणि जोरात आमच्या आईंनाच धडक दिली. ती धडक इतकी जबरदस्त होती कि त्या गाडीने आईंना १५-२० फूट फरफटत नेले . आई अगदी निपचित पडलेल्या. गर्दी झाली आणि सार्वजन ओरडायला लागले , " मर गई !! मर गई !!" दवाखान्यात घेऊन गेले असता दोन्ही पायाच्या गुडघ्यांना जबर मार लागला होता असे कळले. तात्पुरती treatment घेऊन त्या, इतरांबरोबर घरी आल्या. तोपर्यंत घरी काहीच कळवले नव्हते. घरापाशी रिक्षा थांबली. ' आईच्या बोलण्याचा आवाज येतोय पण येवढा वेळ झाला तरी घरात कशी आली नाही',  म्हणून बघायाला हे तीघे बाहेर गेले. जाऊन पाहतात तो काय ! ह्या अगदी हळू हळू बाजूला धरत धरत सावकाशपणे लंगडत चालत होत्या. चेहेर्यावर - हसू व यातना - दोन्हींचा संमिश्र भाव !! बाबांना कळेना काय झालय . सावकाश घरात येऊन बसल्यावर मग आईंनी हळूहळू घडलेली सर्व हकीकत सांगितली. बाबा, अतुल, राहुल अवाक !! येवढा त्रास होऊन देखील आईंनी घरी काहीच कळवले नाही आणि आत्तासुद्धा अगदी सावकाशीने सर्व सांगत होत्या . ते का ? तर बाबा heart patient होते व अतुल - राहुलची १२वी - १०वीची परीक्षा सुरु होती - त्यांना धक्का नको म्हणून हे सर्व कळवले नाही. आजही त्यांना गुडघ्यांचा खूपच त्रास होतो. एका गुडघ्याचं   knee replacement केलंय. पण तरीही कायम हसरयाच असतात. दुखतंय / त्रास होतोय म्हणून एकच ठिकाणी बसल्या आहेत किंवा कुरकुर करत आहेत असे काहीच नाही,  
      येणारा दिवस हसत खेळत घालवणे हे जणू त्यांनी ठरवलेच !! आपण दुखी व्हायचे नाही आणि आपल्यामुळे इतरांना दुखी होऊ द्यायचे नाही हेच त्यांचे जणू तत्व !! असेच दिवस जात होते, येणारे सण -वार मनापासून कारायचे . आमच्याकडे गणपती महालक्ष्मी  व नवरात्र साजरा करतात. घरात एकटी बाई - येणारी मंडळी , पाहुणे , सणवारांचे सवाष्ण -ब्राह्मण , गुरुजी - सर्वांचे कौतुक अगदी मनापासून केले. घरात मदत करणारे हात म्हणजे - बाबा , अतुल - राहुल.    
      अशातच ऑक्टोबर १९८९ चा महिना . देवाच्या मनात काय होते / काय असते कोण जाणे .. नवरात्रीचा उत्सव घरात मांडलेला ( तेव्हा माझी व राहुलची ओळख झाली होती त्यामुळे घरी येणेजाणे रोजचेच . आमचा प्रेमविवाह ) नवरात्रीतही मी घरी यायचे . लग्नाची परवानगी मिळालेली होती , पण आम्ही दोघेही शिकत होतो म्हणून ३ वर्षे तरी थांबायचे - राहुलला नौकरी मिळाली कि मग लग्न करायचे असे सर्वानुमते ठरले होते. नवरात्रात आमचे पराशरे गुरुजी घरी येऊन देवीचा पाठ करत.
      दुसर्या दिवशी दसरा. मी, घरी आदल्याच दिवशी खूप वेळ थांबले होते . तर बाबा म्हणाले , " आज तू लौकर घरी जा. पुढचा दसरा तुला इकडेच करावयाचा आहे. आज तू mummy-पप्पाबरोबर रहा, " मी खरतर निराश होऊनच घरी निघाले. काय माहित - पण त्यादिवशी मी जरा अस्वस्थच होते. आणि माझे व राहुलचे भांडण झालेच आणि मी घरी आले. इकडे, " उद्या दसरा आहे अनु ला श्रीखंड बटाटा भाजी फार आवडत म्हणून , तिला आल्यावर नक्की दे . कोणीही त्याला हात लावायचा नाही " अशी सग्गळ्यांना ताकीद !! ( मला, श्रीखंड व बटाटा भाजी अतिशय आवडत , म्हणून खास जास्त मागवून ठेवली होती )
      सग्गळे मित्रपरिवार येऊन भेटून गेले व सर्वांनी हसत खेळत दिवस घालवला . रात्री आई घर आवारात होत्या तर, " आत्ता आवरू नकोस, उद्या आवरावच लागेल . दमू नकोस" अस बाबांनी आईंना सांगितले. आणि रात्री severe heart attack आला......!! क्षणभर फक्त .....! आणि आमचे बाबा आम्हाला कायमचे सोडून गेले....कुणालाही न कळवता ...न सांगता ....
      सकाळी ८ वाजता , माझ्या घरी राहुल चे २ मित्र आले , माझ्या mummyला सर्व सांगितले व " तुम्ही पप्पांना घेऊन लगेच निघा , आम्ही अनु ला घेऊन जातो ..."   त्यादिवशी मी जरा उशीरच उठले होते , तर mummy ने मला , "योगेश बरोबर तुला घरी बोलावलंय ...." एवढेच सांगितले. वाटेत दोघेही मित्र गप्पं!! मग कधीतरी मला सांगितले ," अनु, बाबा गेले. तू स्वतःला सावर....." जबरदस्त धक्का होता तो. काहीच बोलता आले नाही..घरी पोहोचलो आणि .....पळत दारापाशी गेले ...तर...बाबा निपचित झोपलेले....हालचाल नाही.... आजूबाजूला सर्व पुरुष बसलेले ...अस्पष्ट ..राहुल - अतुल दिसले...मला जरा चक्कर आल्यासारखे वाटले आणि काही कळायच्या आतच राहुल ने पुढे येऊन सावरले. आईजवळ घेऊन गेला. मला तर काहीच सुचेना काय बोलावे. आईंनीच मला जवळ घेतले आणि , मी त्यांना धीर देण्याऐवजी त्यांनीच मला सावरले धीर दिला आणि मला जवळ घेऊन कुरुवाळत म्हणाल्या ..." अनु, त्यांना तुझे कौतुक करायचे होते. धुमधडाक्यात तुमचे लग्न करायचे होते. पण तुम्हा पोरांच्या नशिबी त्यांचे सुख नाही ...तुझे बाबा गेले....." असे म्हणत त्यांनी अश्रूंना वाट दिली...."तुझ्या हातचा चहा त्यांना फार आवडायचा . "चाय हो तो ऐसी " असे आवर्जून म्हणायचे " .
      हा नियतीचा खेळ आईंनी निमुटपणे सहन केला आणि वर्षाच्या आत आमचे लग्न झाले . आई फार उदास राहायच्या . त्यांच्या हसत्या खेळत्या परिवाराला जणू खीळच  लागली होती, त्यांचे उदास राहणे बघून व रिती रिवाज म्हणून आमचे लग्न लौकर झाले. २७ february १९९० ला साखरपुडा व ३ मे १९९० ला लग्न ! लग्नातही सर्व सोपस्कार त्यांनी व्यवस्थित पार पाडले. माझे मोठे दीर दीपकदादा - आरतीवाहिनीनी आमचे लग्न लावले. पण त्या अजूनही म्हणतात , " अनु तुझ्या लग्नाच्या पहिल्या वर्षी मी काहीच करू शकले नाही. सणवार आणि कौतुकही करू शकले नाही. " ह्याची आईंना आजही खंत वाटते.
      एक वर्ष झाले आणि १६ नोव्हेंबर १९९१ ला - माझ्या मुलीचा - सुरश्रीचा जन्म झाला. माझ्या बाळंतपणाच्या वेळेस मला फार tension होते. आमच्याकडे आधी ४ मुली .- म्हणजे दीपकदादाच्या २ आणि प्रदिप्दादाची १. आणि आता मुलगाच होईल म्हणून सर्व नातेवाईकांची माझ्याकडून अपेक्षा होती.
      पण आमच्या आईंनी कधीही अशी अपेक्षा ठेवली नाही, त्या कायम म्हणायच्या, " अनु, तू काळजी करू नकोस. मला मुलगा - मुलगी काहीही चालेल. मुलगी झाली तरी माझ्या घरची लक्ष्मीच आहे ती. !! त्यामुळे तू काळजी करू नकोस. " त्यांच्या ह्या बोलण्याने मला खूप धीर यायचा. आणि सुरश्री आली. !! त्यांना खूsssप आनंद झाला. त्यांनी तिचे खूप कौतुक केले. तिची झबली टोपडी त्यांनी स्वतः शिवले. स्वेटर तर न जाणो किती तरी स्वतः विणले. "माझी सुरश्री --माझी ताई" खूप दिवस तर त्यांचे तेवढेच जग होते. त्या आणि सुमा (सुरश्री चे दुसरे नाव सुमीरा ) !! तिचे सर्वकाही त्याच करायच्या. तिच्याशी गप्पा कर..गाणी म्हण , गोष्टी सांग, तिच्याशी खेळ ...नवनवीन गोष्टी शिकव ...एक ना अनेक.  
      सुरश्रीच्या वेळेसच अतुलदादाचे लग्न झाले. नीता आली. मग सुरश्री व नीता ची पहिली संक्रात एकत्र! दोघींचेही हलव्याचे दागिने -- अगदी हलवा बनवण्यापासून आईंनी सर्व घरीच केले - मला शिकवले. लग्नाच्या आधीपासूनच अतुल नौकरीनिमित्त मुंबईत रहात होते.लग्नानंतर दोघे (अतुल-नीता ) मुंबईस परतले. तिथे आईंनी त्यांचा संसार थाटून दिला. आणि इकडे त्यांचे routine बदलले --- शाळा, क्लासेस, tutions आणि सुरश्री.
      आणि साची चा जन्म झाला !! (अतुल-नीता ची मुलगी ) दोन - दोन नाती !! आई एकदम खूष !! नामकरण पण त्यांनीच केला -- सुरश्री - देवश्री (साची ) !!
      अगदी लहानपणापासून , आई दोघींना (सुमा - साची ) घेऊन फिरायला जायच्या . १९९३ मध्ये आईंनी शाळेतून retirement घेतली . आणि त्या -- अतुलदादा ची बदली पुण्यात झाली म्हणून त्यांच्याबरोबर पुण्यात स्थायिक झाल्या, अतुलदादा - नीता दोघेही नौकरी करत."साची ला पाळणाघरात ठेवण्यापेक्षा, मी साम्भाळेन " अस म्हणून त्याच त्यांच्याकडे गेल्या. तिकडे त्यांच जग - आई आणि साची !! घरातली सर्व जबाबदारी त्यांनी सांभाळली . सुरश्री पुण्याला गेली कि त्या, सुमा व साची ला घेऊन कुठे बागेत जा तर कधी बँकेत, तर कधी कोणा नातेवाईकाकडे  पण ह्या दोघींना घेऊनच जायच्या !!
      मग आला सुदीप - माझा मुलगा ! त्याच्या जन्माच्या वेळेस आई - २५ डिसेंबर १९९६ ला आई नागपूर ला होत्या. आणि माझे mummy पप्पा होते माझ्याजवळ . पण तरीही मला खूप उदास वाटायचे, कारण माझ्या आई नव्हत्या माझ्याजवळ ! सुदीप झाल्याची बातमी नागपूरला कळली आणि एकच जल्लोष झाला.." मुलगा झाला ..मुलगा झाला !!" माझी एक नुकतीच वयात येणारी पुतणी , जिला हे सर्व कळत होत , तिने हा जल्लोष बघितला आणि म्हणाली , " त्यात काय झालं ? मुलगाच झालाय न ! त्यात येवढा आनंद होण्यासारखे काय ? " सग्गळे एकदम गप्प. मग आमच्या आईंनी तिला जवळ घेऊन तिला तिच्या वयानुसार समजून सांगितले आणि तिला ते पटल देखील ! झालं! आईंची घरी निघायची धावपळ सुरु झाली . कधी एकदा नाशिक ला परत जाते असे झाले. नाशिकला स्टेशनवरून तडक त्या, दवाखान्यात आल्या . आधी माझ्याजवळ येऊन , माझ्या गालावरून हात फिरवून , "कशी आहेस ?" ही विचारपूस करून मग त्या सुदीपकडे वळल्या. सुमाला जवळ घेऊन , " तू ताई झालीस " असे म्हणून दोन्ही नातवंडमध्ये गुरफटून गेल्या. सुमालाही सूनु आज्जी आल्यामुळे खूप आनंद झाला. कारण त्यांचा तिला खूप सहवास लाभला होता. अजूनही तिला तिच्या आज्जीला खूपखूप गोष्टी सांगायच्या होत्या. मग ती आणि तिची आज्जी !. आजही तिच्या मनात काही असेल तर , आधी आज्जी मग बाकीचे असे समीकरण. आणि काही वर्षांनी आला शुभम - १८ नोव्हेंबर २००० ! - अतुलदादा - नीता चा मुलगा . आईंचा परिवार वाढला - अतुल राहुल, नीता अनु, साची सुमा, सुदीप शुभम! हाच त्यांचा परिवार. आजही आमच्याकडे काहीही वस्तू आईंनी घेतली तर , २-२ अशाच घेतात,

( क्रमश:)