Wednesday, 3 August 2016

.........श्रीमती सुनीला यशवंत संत ........ भाग २


"आमच्या सासूबाई "

श्रीमती सुनीला यशवंत संत 

भाग २ .....

      तसेच करमरकरांच्या आधी त्यांच्याच flatमध्ये एक जोडपे रहात होते. एकदा ते मालक ऑफिसला गेले असता त्या बाईंना काहीतरी जोरात कापले (पोटाच्या खाली ) व त्या जोरजोरात ओरडायला लागल्या. राहुलने त्यांना विचारल्यावर , "तुमच्या आईंना लग्गेच पाठवता का ?" असे विचारले . आई तिथे गेल्यावर त्यांच्या लक्षात आले कि त्या बाईंना लग्गेच दवाखान्यात न्यावे लागेल. कारण continuously रक्तस्त्राव होत होता. आईंनी ताबडतोब त्यांना उचलले आणि रिक्षेतून दवाखान्यात घेऊन गेल्या. ती जखम इतकी सेरियस होती कि डॉक्टरांनी ताबडतोब एक छोटेशी शस्त्रक्रिया करून रक्तस्त्राव थांबवला. तेवढया वेळात त्यांच्या Mrना फोने करून बोलावून घेतले. ते आल्या आल्या आईवरच खूप चिडले. "शस्त्रक्रिया करण्या अगोदर मला का नाही बोलावले?" वगैरे .... आईंनी त्यांचे सर्व बोलणे ऐकून घेतले व त्यांना खरी खोटी सुनावून त्या म्हणाल्या, " आम्ही दवाखान्यात आलो तेव्हा परिस्थिती बघूनच Drनी ताबडतोब शस्त्रक्रियेचा निर्णय घेतला. आणि त्यांना आपल्यापेक्षा जास्त कळत. ते डॉक्टर आहेत कि तुम्ही ?" नंतर काही वेळाने त्या माणसाचा राग शांत झाला व त्यांनी आईची माफी मागितली.
      अतुल - राहुल लहान असतांना "रमेश " नावाचा १४-१५ वय वर्षाचा मुलगा त्यांच्याबरोबर राहायचा. घरातली छोटी मोठी कामे करत असे. पण आई बाबांनी त्याला कधी परके समजलेच नाही. आपलाच तिसरा मुलगा म्हणून त्यालाही चांगल्या मार्गाला लावले. लग्नाचे वय झाले असता - चांगल्या घरातली मुलगी बघून त्याचे लग्न ह्यांनीच लावले व संसारही मांडून दिला. आजही रमेशदादा आईंना न चुकता भेटायला येतात. आम्ही तर त्यांना मोठ्या भावासारखाच मान देतो.
      अतुल - राहुल १२वी - १०वीत असतानाची गोष्ट. आई काही कामानिमित्त काही ओळखीच्यासह (नरेंद्र देशपांडे व इतर ) मुंबईला गेल्या होत्या. काम झाल्यावर बस स्थानकावर येताना एक गाडी चुकीच्या बाजूने overtake करत आली आणि जोरात आमच्या आईंनाच धडक दिली. ती धडक इतकी जबरदस्त होती कि त्या गाडीने आईंना १५-२० फूट फरफटत नेले . आई अगदी निपचित पडलेल्या. गर्दी झाली आणि सार्वजन ओरडायला लागले , " मर गई !! मर गई !!" दवाखान्यात घेऊन गेले असता दोन्ही पायाच्या गुडघ्यांना जबर मार लागला होता असे कळले. तात्पुरती treatment घेऊन त्या, इतरांबरोबर घरी आल्या. तोपर्यंत घरी काहीच कळवले नव्हते. घरापाशी रिक्षा थांबली. ' आईच्या बोलण्याचा आवाज येतोय पण येवढा वेळ झाला तरी घरात कशी आली नाही',  म्हणून बघायाला हे तीघे बाहेर गेले. जाऊन पाहतात तो काय ! ह्या अगदी हळू हळू बाजूला धरत धरत सावकाशपणे लंगडत चालत होत्या. चेहेर्यावर - हसू व यातना - दोन्हींचा संमिश्र भाव !! बाबांना कळेना काय झालय . सावकाश घरात येऊन बसल्यावर मग आईंनी हळूहळू घडलेली सर्व हकीकत सांगितली. बाबा, अतुल, राहुल अवाक !! येवढा त्रास होऊन देखील आईंनी घरी काहीच कळवले नाही आणि आत्तासुद्धा अगदी सावकाशीने सर्व सांगत होत्या . ते का ? तर बाबा heart patient होते व अतुल - राहुलची १२वी - १०वीची परीक्षा सुरु होती - त्यांना धक्का नको म्हणून हे सर्व कळवले नाही. आजही त्यांना गुडघ्यांचा खूपच त्रास होतो. एका गुडघ्याचं   knee replacement केलंय. पण तरीही कायम हसरयाच असतात. दुखतंय / त्रास होतोय म्हणून एकच ठिकाणी बसल्या आहेत किंवा कुरकुर करत आहेत असे काहीच नाही,  
      येणारा दिवस हसत खेळत घालवणे हे जणू त्यांनी ठरवलेच !! आपण दुखी व्हायचे नाही आणि आपल्यामुळे इतरांना दुखी होऊ द्यायचे नाही हेच त्यांचे जणू तत्व !! असेच दिवस जात होते, येणारे सण -वार मनापासून कारायचे . आमच्याकडे गणपती महालक्ष्मी  व नवरात्र साजरा करतात. घरात एकटी बाई - येणारी मंडळी , पाहुणे , सणवारांचे सवाष्ण -ब्राह्मण , गुरुजी - सर्वांचे कौतुक अगदी मनापासून केले. घरात मदत करणारे हात म्हणजे - बाबा , अतुल - राहुल.    
      अशातच ऑक्टोबर १९८९ चा महिना . देवाच्या मनात काय होते / काय असते कोण जाणे .. नवरात्रीचा उत्सव घरात मांडलेला ( तेव्हा माझी व राहुलची ओळख झाली होती त्यामुळे घरी येणेजाणे रोजचेच . आमचा प्रेमविवाह ) नवरात्रीतही मी घरी यायचे . लग्नाची परवानगी मिळालेली होती , पण आम्ही दोघेही शिकत होतो म्हणून ३ वर्षे तरी थांबायचे - राहुलला नौकरी मिळाली कि मग लग्न करायचे असे सर्वानुमते ठरले होते. नवरात्रात आमचे पराशरे गुरुजी घरी येऊन देवीचा पाठ करत.
      दुसर्या दिवशी दसरा. मी, घरी आदल्याच दिवशी खूप वेळ थांबले होते . तर बाबा म्हणाले , " आज तू लौकर घरी जा. पुढचा दसरा तुला इकडेच करावयाचा आहे. आज तू mummy-पप्पाबरोबर रहा, " मी खरतर निराश होऊनच घरी निघाले. काय माहित - पण त्यादिवशी मी जरा अस्वस्थच होते. आणि माझे व राहुलचे भांडण झालेच आणि मी घरी आले. इकडे, " उद्या दसरा आहे अनु ला श्रीखंड बटाटा भाजी फार आवडत म्हणून , तिला आल्यावर नक्की दे . कोणीही त्याला हात लावायचा नाही " अशी सग्गळ्यांना ताकीद !! ( मला, श्रीखंड व बटाटा भाजी अतिशय आवडत , म्हणून खास जास्त मागवून ठेवली होती )
      सग्गळे मित्रपरिवार येऊन भेटून गेले व सर्वांनी हसत खेळत दिवस घालवला . रात्री आई घर आवारात होत्या तर, " आत्ता आवरू नकोस, उद्या आवरावच लागेल . दमू नकोस" अस बाबांनी आईंना सांगितले. आणि रात्री severe heart attack आला......!! क्षणभर फक्त .....! आणि आमचे बाबा आम्हाला कायमचे सोडून गेले....कुणालाही न कळवता ...न सांगता ....
      सकाळी ८ वाजता , माझ्या घरी राहुल चे २ मित्र आले , माझ्या mummyला सर्व सांगितले व " तुम्ही पप्पांना घेऊन लगेच निघा , आम्ही अनु ला घेऊन जातो ..."   त्यादिवशी मी जरा उशीरच उठले होते , तर mummy ने मला , "योगेश बरोबर तुला घरी बोलावलंय ...." एवढेच सांगितले. वाटेत दोघेही मित्र गप्पं!! मग कधीतरी मला सांगितले ," अनु, बाबा गेले. तू स्वतःला सावर....." जबरदस्त धक्का होता तो. काहीच बोलता आले नाही..घरी पोहोचलो आणि .....पळत दारापाशी गेले ...तर...बाबा निपचित झोपलेले....हालचाल नाही.... आजूबाजूला सर्व पुरुष बसलेले ...अस्पष्ट ..राहुल - अतुल दिसले...मला जरा चक्कर आल्यासारखे वाटले आणि काही कळायच्या आतच राहुल ने पुढे येऊन सावरले. आईजवळ घेऊन गेला. मला तर काहीच सुचेना काय बोलावे. आईंनीच मला जवळ घेतले आणि , मी त्यांना धीर देण्याऐवजी त्यांनीच मला सावरले धीर दिला आणि मला जवळ घेऊन कुरुवाळत म्हणाल्या ..." अनु, त्यांना तुझे कौतुक करायचे होते. धुमधडाक्यात तुमचे लग्न करायचे होते. पण तुम्हा पोरांच्या नशिबी त्यांचे सुख नाही ...तुझे बाबा गेले....." असे म्हणत त्यांनी अश्रूंना वाट दिली...."तुझ्या हातचा चहा त्यांना फार आवडायचा . "चाय हो तो ऐसी " असे आवर्जून म्हणायचे " .
      हा नियतीचा खेळ आईंनी निमुटपणे सहन केला आणि वर्षाच्या आत आमचे लग्न झाले . आई फार उदास राहायच्या . त्यांच्या हसत्या खेळत्या परिवाराला जणू खीळच  लागली होती, त्यांचे उदास राहणे बघून व रिती रिवाज म्हणून आमचे लग्न लौकर झाले. २७ february १९९० ला साखरपुडा व ३ मे १९९० ला लग्न ! लग्नातही सर्व सोपस्कार त्यांनी व्यवस्थित पार पाडले. माझे मोठे दीर दीपकदादा - आरतीवाहिनीनी आमचे लग्न लावले. पण त्या अजूनही म्हणतात , " अनु तुझ्या लग्नाच्या पहिल्या वर्षी मी काहीच करू शकले नाही. सणवार आणि कौतुकही करू शकले नाही. " ह्याची आईंना आजही खंत वाटते.
      एक वर्ष झाले आणि १६ नोव्हेंबर १९९१ ला - माझ्या मुलीचा - सुरश्रीचा जन्म झाला. माझ्या बाळंतपणाच्या वेळेस मला फार tension होते. आमच्याकडे आधी ४ मुली .- म्हणजे दीपकदादाच्या २ आणि प्रदिप्दादाची १. आणि आता मुलगाच होईल म्हणून सर्व नातेवाईकांची माझ्याकडून अपेक्षा होती.
      पण आमच्या आईंनी कधीही अशी अपेक्षा ठेवली नाही, त्या कायम म्हणायच्या, " अनु, तू काळजी करू नकोस. मला मुलगा - मुलगी काहीही चालेल. मुलगी झाली तरी माझ्या घरची लक्ष्मीच आहे ती. !! त्यामुळे तू काळजी करू नकोस. " त्यांच्या ह्या बोलण्याने मला खूप धीर यायचा. आणि सुरश्री आली. !! त्यांना खूsssप आनंद झाला. त्यांनी तिचे खूप कौतुक केले. तिची झबली टोपडी त्यांनी स्वतः शिवले. स्वेटर तर न जाणो किती तरी स्वतः विणले. "माझी सुरश्री --माझी ताई" खूप दिवस तर त्यांचे तेवढेच जग होते. त्या आणि सुमा (सुरश्री चे दुसरे नाव सुमीरा ) !! तिचे सर्वकाही त्याच करायच्या. तिच्याशी गप्पा कर..गाणी म्हण , गोष्टी सांग, तिच्याशी खेळ ...नवनवीन गोष्टी शिकव ...एक ना अनेक.  
      सुरश्रीच्या वेळेसच अतुलदादाचे लग्न झाले. नीता आली. मग सुरश्री व नीता ची पहिली संक्रात एकत्र! दोघींचेही हलव्याचे दागिने -- अगदी हलवा बनवण्यापासून आईंनी सर्व घरीच केले - मला शिकवले. लग्नाच्या आधीपासूनच अतुल नौकरीनिमित्त मुंबईत रहात होते.लग्नानंतर दोघे (अतुल-नीता ) मुंबईस परतले. तिथे आईंनी त्यांचा संसार थाटून दिला. आणि इकडे त्यांचे routine बदलले --- शाळा, क्लासेस, tutions आणि सुरश्री.
      आणि साची चा जन्म झाला !! (अतुल-नीता ची मुलगी ) दोन - दोन नाती !! आई एकदम खूष !! नामकरण पण त्यांनीच केला -- सुरश्री - देवश्री (साची ) !!
      अगदी लहानपणापासून , आई दोघींना (सुमा - साची ) घेऊन फिरायला जायच्या . १९९३ मध्ये आईंनी शाळेतून retirement घेतली . आणि त्या -- अतुलदादा ची बदली पुण्यात झाली म्हणून त्यांच्याबरोबर पुण्यात स्थायिक झाल्या, अतुलदादा - नीता दोघेही नौकरी करत."साची ला पाळणाघरात ठेवण्यापेक्षा, मी साम्भाळेन " अस म्हणून त्याच त्यांच्याकडे गेल्या. तिकडे त्यांच जग - आई आणि साची !! घरातली सर्व जबाबदारी त्यांनी सांभाळली . सुरश्री पुण्याला गेली कि त्या, सुमा व साची ला घेऊन कुठे बागेत जा तर कधी बँकेत, तर कधी कोणा नातेवाईकाकडे  पण ह्या दोघींना घेऊनच जायच्या !!
      मग आला सुदीप - माझा मुलगा ! त्याच्या जन्माच्या वेळेस आई - २५ डिसेंबर १९९६ ला आई नागपूर ला होत्या. आणि माझे mummy पप्पा होते माझ्याजवळ . पण तरीही मला खूप उदास वाटायचे, कारण माझ्या आई नव्हत्या माझ्याजवळ ! सुदीप झाल्याची बातमी नागपूरला कळली आणि एकच जल्लोष झाला.." मुलगा झाला ..मुलगा झाला !!" माझी एक नुकतीच वयात येणारी पुतणी , जिला हे सर्व कळत होत , तिने हा जल्लोष बघितला आणि म्हणाली , " त्यात काय झालं ? मुलगाच झालाय न ! त्यात येवढा आनंद होण्यासारखे काय ? " सग्गळे एकदम गप्प. मग आमच्या आईंनी तिला जवळ घेऊन तिला तिच्या वयानुसार समजून सांगितले आणि तिला ते पटल देखील ! झालं! आईंची घरी निघायची धावपळ सुरु झाली . कधी एकदा नाशिक ला परत जाते असे झाले. नाशिकला स्टेशनवरून तडक त्या, दवाखान्यात आल्या . आधी माझ्याजवळ येऊन , माझ्या गालावरून हात फिरवून , "कशी आहेस ?" ही विचारपूस करून मग त्या सुदीपकडे वळल्या. सुमाला जवळ घेऊन , " तू ताई झालीस " असे म्हणून दोन्ही नातवंडमध्ये गुरफटून गेल्या. सुमालाही सूनु आज्जी आल्यामुळे खूप आनंद झाला. कारण त्यांचा तिला खूप सहवास लाभला होता. अजूनही तिला तिच्या आज्जीला खूपखूप गोष्टी सांगायच्या होत्या. मग ती आणि तिची आज्जी !. आजही तिच्या मनात काही असेल तर , आधी आज्जी मग बाकीचे असे समीकरण. आणि काही वर्षांनी आला शुभम - १८ नोव्हेंबर २००० ! - अतुलदादा - नीता चा मुलगा . आईंचा परिवार वाढला - अतुल राहुल, नीता अनु, साची सुमा, सुदीप शुभम! हाच त्यांचा परिवार. आजही आमच्याकडे काहीही वस्तू आईंनी घेतली तर , २-२ अशाच घेतात,

( क्रमश:)

Friday, 29 July 2016

...... श्रीमती सुनीला यशवंत संत......

२००४ मध्ये मी ,माझ्या वाढदिवसानिमित्त  माझ्या सासूबाईना एक सरप्राईज गिफ्ट दिले - त्यांच्यावर लिहिलेला हा लेख !!!!!!
आधी वाटलं कि त्यांच्यावर एखादी कविता लिहावी ... पण मग सहज वाटलं कि ... त्यांचे भारी व्यक्तिमत्व त्या छोट्या कवितेत मावेल ? आणि हाती पेन घेतला -- तर जसे विचार येत गेले तशी लिहित गेले . मनातले सर्व विचार कागदावर उमटले आणि त्याचा झाला एक छोटासा लेख तय्यार !!! -- ज्यात फक्त माझे त्यांच्याबद्दल चे विचार आहेत --- जे मी बघितल ,अनुभवलं , माहित आहे . आई अशीच कायम तुमची साथ मिळत राहो हीच देवाकडे मनापासून प्रार्थना !!

"आमच्या सासूबाई "

श्रीमती सुनीला यशवंत संत 

हे नाव तुम्हाला नवीन आहे ! " कोण ह्या ?" असा प्रश्न नक्कीच पडला असेल , 
आणि "त्यांच्याबद्दल नवीन काय ?" असे तुम्हाला वाटत असेल. 
तर , ओळख करून देते मी तुमची. "ह्या माझ्या सासूबाई "!! 
"हीच का त्यांची ओळख ..सासू विषयी लेख ??" ..... 
"नाही हीच त्यांची ओळख नव्हे ". 

एक स्त्री - नव्या पिढीतली सासू - आदर्श सासू , आई , आज्जी, मैत्रीण !!
त्यांच्याबद्दल थोडक्यात ...

लग्नापूर्वीच्या - मालती वासुदेव पाठक .वडील प्रसिद्ध दंतरोगतज्ञ ! 

तर, ह्या मालती बाईची लहानपणापासूनच अभ्यासाबरोबरच सतत नवीन -नवीन शिकण्याची हौस! त्या निमित्ते वडिलांच्या व्यवसायासंबंधी बराच काही शिकल्या व कधी कधी त्यांना मदतही करत असे. घरातदेखील पाककला , कलाकुसर आणि शिवाय त्या काळातले विमान (Flying Glider) देखील चालावले . हवेत तब्बल ५० तास पूर्ण केले!! म्हणजे बालवयापासूनच ह्या धाडसी वृत्तीच्या !! 
तरुण वयात इतर भावंडांची लहान मुले ह्यांच्या जवळपास जास्त . "मालू आत्या / मालू मावशी " ही ह्यांची खास मैत्रीणच ! ह्यांचा परिवार मोठा - ३ बहिणी व ५ भाऊ , आई व वडील . हे कमी कि काय , इतरही काही नातलगांची समवयस्क भावंड राहायची व "मालू " ही आपल्याच वयाची , आपल्या सुखदुखातील हक्काची मैत्रीण ! आणि त्यामुळे सगळ्यात मालुचाच लळआ जास्त . लग्नाचे वय झाले आणि अगदी सहज चालून आलेल स्थळ - यशवंत पुंडलिक संत ! संतांनी नकार द्यायला जागाच नव्हती मुळी!! झाले !! वर -वधू तयार . आनंदात विवाह पार पडला "मालती" "सुनीला " झाली !
जशी माहेरी सगळ्याची लाडकी , तशीच सासरच्यांची मने जिंकून सर्वांची सुनीला झाली . प्रत्येक कार्यात - घरकामात सुनीला पुढे. कुठलीही गोष्ट / कुठलेही काम असे नाही कि येत नाही . कोणीही काहीही सांगोत , .." हो करते ".. आणि ते काम सहज आटोपले जाई !! 
     आमच्या मोठ्या काकू - आईची सर्वात मोठ्या जाऊ - उषा काकू ह्यांनी आमच्या बाबांना अगदी स्वतःच्या मुलासारखे प्रेम केले व वाढवले. त्यांचा ह्या दोघांवर जास्तच जीव . चौघा भावात बाबा सर्वात धाकटे (शेंडेफळ ) , घरातले सर्वांचेच आवडते . मिलिट्रीत जायची भारी हौस . देशसेवा हा निष्पाप हेतू आणि त्यांना संधी मिळालीदेखील ! NCCत दाखल झाले. NCC चे Administration Department हे Army शी संलग्न होते . अगदी युद्धात जायची त्यांची इच्छा होती , युद्धात सामील नाही झाले. पण पुढे आयुष्यातली इतर युद्धे अगदी हसत खेळत जिंकली - NCCत असल्यामुळे सतत बदल्या. त्यांच्याबरोबर आईसुद्धा जायच्या. बदलीच्या ठिकाणी पुष्कळ नवीन माणसे / नाती जुळली. दोघांचा सम स्वभाव - ' हसत खेळत जीवनाला सामोरे जायचे' आणि काही वर्षांनी ह्या वेलीवर दोन फुले आली - अतुल व राहुल . अतुलचा जन्म अमळनेरचा आणि राहुलचा औरंगाबाद - मिलिटरी हॉस्पिटल मधला. 
      अमळनेर ला असतांना dr देशमाने ह्यांच्याकडे ते रहात. त्यांच्याशी तर अगदी नात्यातल्या सारखीच जवळीक झाली. बाबा मिलिटरीत असतांना कॅन्टीनमधून फुकटात / स्वस्तात वस्तू मिळायच्या. काहीहजण तर "संतसाहेब हे तुमच्यासाठी...." असे म्हणून पुष्कळ गोष्टी / जिन्नस घेऊन येत, पण बाबांनी कधीही अशा वस्तू घेतल्या नाहीत . "मी कमावता आहे, ह्याच वस्तू मला पाहिजे असतील तेव्हा मी विकत घेईन . परत असे करून आपले नाते बिघडवू नका " असे नम्रतेने सांगून परत करत असे. 
     दोघांनाही शिक्षणाचे महत्व भरपूर , म्हणूनच लग्नानंतरदेखील त्यांनी पत्नीला शिक्षण पूर्ण करू दिले. आई - B.A. (Economics) झाल्या . तिला स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी पुरेपूर मुभा दिली आणि आईंनीदेखील त्याचा फायदा घेत, स्वतःला त्या काबील बनवले. 
      नागपूर - अमळनेर - औरंगाबाद - कोपरगाव - नाशिक. औरंगाबादहून NCCतून Retirement घेऊन बाबा कोपरगावला गेले . तिथल्या Somaiya College मध्ये प्राध्यापकाची नौकरी स्वीकारली. कोपरगावला असतांना - प्रा. घैसास , प्रा.कुलकर्णी ह्यांच्याशी गाढ मैत्री जमली.सर्वांचेच छंद जवळ जवळ सारखेच! गाण्याची तर प्रत्येकालाच आवड ! मग काय !! वेळ मिळाला कि दिलखुलास गप्पा गाणी जेवण - असे कार्यक्रम सुरु झाले ! सगळ्यान्चीच मुले तेव्हा लहान होती . तेव्हाची जी जवळीक / आपुलकी निर्माण झाली - ती आजही टिकून आहे ! बाबांचा विषय होता English & Literature. Literature तर आवडता विषय गाढे अभ्यासक . शिकवण्यासाठी कधीच 'नोटस' अशा काढल्याच नाहीत एकपाठी होते. त्यामुळे शिक्षकांचे व विद्यार्थ्यांचे लाडके / आवडते व्हायला वेळ लागला नाही. स्वतः संगीत विशारद ! नाटयाची भारी वेड. त्यामुळे कॉलेजमधल्या स्नेहसंमेलनसाठी नव-नवीन कल्पना लढवून नाट्य - गायन स्पर्धा मुलांकरवी घेतल्या. 
      कोपरगावसोडून आई -बाबा आले नाशिकला . तेव्हा ते S.T.Colonyत रहात होते. इथे आल्यावर त्यांनी मराठा विद्या प्रसारक संस्थेत नौकरी स्वीकारली. १५ जुन १९७२ रोजी नाशकात दाखल झाले. ऑगस्ट महिन्यात आमचे मोठे काका (बाबांचे सख्खे भाऊ ) - ति.स्व. गजूभैया ह्यांना heart attack आला.म्हणून हे चौघे जाऊन आले आणि १८ ऑगस्ट १९७२ ला आमच्या बाबांना पहिला  heart attack आला. त्या काळात heart attack हा एक असाध्य रोग होता. परंतु - नवीन गाव लोक नौकरी यामुळे न डगमगता अत्यंत धीराने व सामर्थ्याने बाबांच्या आजारपणास तोंड दिले. dr शरद कुलकर्णी dr केळकर dr बागुल ह्यांनी मेहेनत करून बाबांना वाचवले व आईंना धीर दिला. त्या काळात नाशिकमध्ये थोडीफार ओळख असलेले - बोटावर मोजण्या ईतकी माणस आईंनी जिंकली व ती कायमची ' आपली माणस ' झाली. त्यात - सेवा मेडिकल चे बाबासाहेब सौन्दांणकर , S.T.Colonyतील शेजारी - शुक्ला तेंडूलकर कुलकर्णी , कॉलेजमधले सहकारी - पांढरे श्रीवास्तव व्यास घोडके बाजपेयी , अगदी टांगावाला गजाभाऊ -- ह्यांचा आवर्जून उल्लेख आईंच्या बोलण्यामध्ये नेहेमीच असतो. डॉक्टरांनी बाबांना "७२ तास अत्यंत कठीण आहेत " असे सांगितले होते. सर्व नातलग नागपूरला होते . ते सर्व नाशकात पोहोचेपर्यंत ह्याच लोकांनी घरच्या सारखी मदत का करावी ? याचे आजही अप्रूप वाटते. हे सर्वांनाच साध्य होईल असे नाही. 
       खरं तर इकडे स्थलांतरित झाल्यावर शास्त्रीय गायन नाट्यक्षेत्र badminton tennis ह्या आपल्या मनस्वी आवडीच्या क्षेत्रात काहीतरी करण्याची संधी मिळेल अशी आई - बाबांची नेहेमीच इच्छा होती. परंतु २ महिन्याच्या सहवासात अडचणीत उपयोगी पडणारी माणस मिळवणे हेही काही कमी नव्हते. पुढे बाबांना प्रकृतीच्या कारण मुळे धावपळ व दगदग करणे शक्य नव्हते . परंतु त्यांनी आईंना तिची प्रगती होऊ देण्यास कधीच रोखले नाही. पुढे प्रकृतीमुळे कॉलेजजवळ लोकमान्य नगर येथे भाड्याने घर घेतले. तिथे शेजार मिळाला - काशीकर, प्रो अरुण देशमुख व प्रो सुहास देशमुख , प्रो देशपांडे इ.चा. हए सगळेजण सम स्वभावामुळे इतके जवळ आले कि प्रो हेमंत व त्यांच्या सौ प्रो प्रभा देशपांडे ह्यांनी आईबाबांना आईवडीलांच्या ठिकाणी मानायला लागले. आणि देशमुखांचे घर हे नातेवाईकांच्या घरासारखे झाले. 
      एकदा देशमुख परिवारातल्या - अरुण-सुचित्रा चा खूप मोठा अपघात झाला होता, तेव्हा आई बाबा कोल्हापूर-गोवा - कारवार येथे गेले होते. परंतु बाहेरगावी जातांना घराची एक किल्ली देशमुखांकडे ठेवून जाणे - या सवईमुळे - अपघात झाला तेव्हा त्यांना भेटायला म्हणून येणारे देशमुखांचे नातेवाईक / मित्रमंडळी ह्यांची सोय व्हावी म्हणून संतांचे घर हे आपलेच घर आहे ह्या भावनेने घर - घरातील वस्तू बिनदिक्कतपणे वापरले . ही आपुलकीची भावना इतरांच्या व जवळच्यांच्या मनात निर्माण होणे हे व्यक्तिमत्वाचे आगळे वेगळे दर्शन इथे घडते. हेमंत काका व प्रभा काकू आजही आईंना, आईंचाच मान देतात. दिवाळी राखी पौर्णिमा सर्वांचे वाढदिवस लक्षात ठेऊन सवडीप्रमाणे एकत्र येऊन साजरे करतात. 
      लोकमान्यनगर येथे असतांना बाबा अनेकदा Sr. Supervision करत. परीक्षेसाठी Supervisor कमी पडले तर विश्वासाने घरी निरोप पाठवत व शिपाई आईंना सांगत , " २-३ Supervisor कमी आहेत , तुम्ही आणि शेजारच्या कोणीतरी या." मग आई, आशाकाकू , सुचीत्राकाकू , काशिकर काकूंना घेऊन Senior College  ची Supervision करत. 
     त्या काळातली प्रसिद्ध गायिका डॉ सुमन माटे यांच्याकडून ईश्वराची आराधना करण्यासाठी भजनही शिकल्या , तर काशीकरकाकूबरोबर ' स्त्रीमंडळ ' जिमखानाच्या सभासद झाल्या. त्यांच्या कलागुणांची पावती म्हणून नाशिक जिमखाना स्त्री मंडळच्या सचिव व त्यानंतर अध्यक्ष म्हणूनही काम बघितले. हा तर त्यांच्या सामाजिक कार्याचा व बांधिलकीचा कळसच म्हणावा लागेल !!
      सुमन माटे ह्यांनी दिग्दरशीत केलेल्या एका ऐतिहासिक व पौराणिक नाटकात तर चक्क 'दशरथराजा ' चा पुरुष पात्र ही रंगवले! आई, अध्यक्ष असतांना हौशी कलाकारांना एकत्र करून श्रीमती दुर्गा भागवत लिखित 'सुंदरा मनामध्ये भरली 'ह्या नाटकात प्रमुख भूमिकाही केली. त्या काळात अकुत, शिऊरकर, सबनीस किर्लोस्कर, चित्रा जोशी , तांबे मावशी ह्यांच्याशी चांगली मैत्री झाली. त्यांची आठवण आजही आई काढतात.
      इकडे बाबांचीदेखील दैनंदिनी कोपरगाव सारखीच होती . शिवाय त्यांनी इंग्लिश विभागासाठी भरपूर उपक्रम राबवले व थोड्याच दिवसात बाबा Head of the Department झाले. 
      एकदा आदर्श शाळेच्या प्रमुख मुख्याध्यापिका ( गाडगीळ क्लास्सेसच्या गाडगीळ सरांच्या मातोश्री ) घरी आल्या आणि " शाळेत चल व शाळा सांभाळ ' असा जणू आईंचा हात धरूनच त्यांना शाळेत घेऊन गेल्या. आई शाळेत शिक्षिका म्हणून रुजूदेखील झाल्या!! बर स्वतः तर झाल्याच परंतु आजूबाजूच्या ओळखीतल्या २-३ जणीनासुद्धा घेऊन गेल्या. आजही त्यातील काही जणी शाळेत कायमस्वरूपी काम करीत आहेत. एक तर अगदी मुख्याध्यापिकादेखील आहेत. !
      आई शाळेत रुजू झाल्या-त्या बालवाडीमध्ये . लहान निरागस मुले तर त्यांची अतिशय आवडती ! त्यांच्यात त्या अगदी संत आज्जी होऊन जात ( काही मुले त्यांना शाळेत टीचर न म्हणता आज्जी म्हणत ) आजही ती मुले भेटली कि , त्यांना संत टीचर भेटल्याचा खूप आनंद होतो. मग सध्या ते काय काय करतात ( आता ते मोठे झालेत ) ते सविस्तरपणे त्यांच्या संत आज्जींना सांगतात. आई बालवाडीतल्या मुलांबरोबर गाणी म्हणत, त्यांना नाचायला शिकवत - खूप मजा करत शिकवत. अस म्हणतात कि , " बालवाडी हा मुलांच्या शिक्षणाचा मुलभूत पाया असतो. इथूनच त्यांना शिक्षणात रस वाढायला लागतो . तिथे त्यांना जे शिकायला / बघायला मिळते ते कायम राहते . " हे खरोखर आमच्या आईंनी करून दाखवले. लहान मुलांसाठी त्यांनी शाळेत विविध उपक्रम राबविले. 
      त्यावेळेस त्यांची दैनंदिनी होती - सकाळी लौकर उठून जमेल तेवढा स्वयंपाक करून ठेवणे, नन्तर शाळेत जाणे, घरी आल्यावर आईबाबांनी जेवणे (अतुल राहुल बरोबर असतील तर सुवर्ण योग ) आणि मग आईंचे क्लासेस सुरु व्हायचे. म्हणजे शाळे व्यतिरिक्त ह्यांचा उरलेला वेळ (शाळा सकाळी ७-१२) शिवणकाम , भरतकाम, tutions ह्यात घालवायच्या. शिवणाची पहिल्यापासूनच आवड . घरातले पुष्कळ रोजचे लागणारे कपडे त्या घरीच शिवत. शिवण क्लासेस घेत, खूप बायका - मुलींना त्यांनी शिवणकला दिली. आता, त्या बायका घरी येऊन फक्त शिवणच करत नव्हत्या - तर त्यांना आईन्मध्ये एक मैत्रीण मिळाली ! मग थोड्या सुख दुखच्या गोष्टी होत आणि त्यावर आई मार्गादर्शन पण करायच्या. 
      आता ह्यांचा मित्रपरिवार मोठा . कोणीही केव्हाही येत . पण कायम स्मितचेहेर्यानेच त्या त्यांचे आव-भगत करत. कॉल्लेगेच्या मुलांचा तर कायमचा राब्ताच होता! कित्येक मुलांना तर त्यांच्या अडचणींच्या वेळेस ( फी भारता येत नाहीत वगैरे ) पुष्कळ मदत केली - परतफेडीची अपेक्षा न ठेवता - त्यांचे शिक्षण मध्येच थांबू नये म्हणून.! 
      एक किस्सा असा .... त्यांचे पगार वेळोवेळी होत नसत. पण वाण्याकडून दरमहा समान तर आणावेच लागे. तर आमच्या गल्लीत एक मंत्री नावाचा वाणी होता (आजही आहे ) त्याने मात्र कधीही पैशांसाठी त्रास दिला नाही. तो त्यांचा आदर च करे. " सर, पैसे कुठे जात नाहीत , जेव्हा सोय होईल तेव्हा तुम्ही द्यालच , काय पाहिजे ते न्या....." असे म्हणत. म्हणून मग आमचे बाबा जेव्हा जेव्हा त्याच्याकडे जात, तेव्हा सहज म्हणत " अन्नदाता सुखी भव" हे त्यालासुद्धा कळले . अगदी ओशाळवाणे वाटून म्हणे , " काय सर , असे हो काय म्हणता .." 
      असे बाबांचे सर्वांशी खेळीमेळीचे नाते. आता बाबांना कुत्र्यांची भारी आवड. एकदा त्यांनी एक छोटेसे गुबगुबीत पांढरे स्वच्छ पोमेरीओन पिल्लू आणले. नामकरण झाले - "चिंगी " (हे देखील बाबांनीच ठेवले) तिलाही खूप चांगल्या सवयी लावल्या. चिंगी घरातली मेम्बेरच बनली. एकदा असेच फिरायला जाताना कुणीतरी म्हणाले, " तुमची कुत्री कुठेय ? आज तुमच्याबरोबर नाही वाटतंय ? ". झाल. बाबा जाम भडकले व त्या इसमाला म्हणाले , " तिचे नाव चिंगी आहे आणि तिला चिंगी च म्हणायचे " इतका त्या मुक्या प्राण्यावर जीव. त्या इसामाने , " माफ करा परत अशी चूक होणार नाही " , असे म्हणल्यावर त्याला जाऊ दिले. 
      आता आमच्या आईंच्या मैत्रिणीदेखील भरपूर - नक्की किती वयाच्या हे नाही सांगता येणार, अगदी छोट्या मुलींपासून तरुण समवयस्क म्हातार्या - सार्या जणी ( आम्ही आमच्या आईंना अजूनही तरुण च समजतो ) आणि इतर बायकांसारखे (अपवाद) त्यांना गप्पांमध्ये रस आहे - पण गप्पा म्हणजे वेगळ्या - आज जगात काय घडतंय ? आपल्याला नवीन काय शिकता येईल ... अशा. 
      आईंना शालेय जीवनापासूनच विविध देशी व विदेशी खेळ , विविध प्रकारची एक अंकी व तीन अंकी नाटकं (बसवणे व कामसुद्धा करणे ) हा त्यांचा जणू छंदच होता. अमळनेरला असतांना भगिनी मंडळ स्थापन करून त्यात विविध समाजोपयोगी उपक्रम राबवले, तर औरंगाबाद येथे NCC Officerची पत्नी म्हणून अनेक सामाजिक कार्यातही रस घेतला. 
      नाशिकात आई बाबांचे ३ ठिकाणी वास्तव्य झाले. भाड्याचे घर असल्याने बदलावे लागे. त्यात बाबांच्या तब्ब्येतीची काळजी घेऊन , घर शक्यतो कॉलेज जवळच ( त्यांना त्रास होऊ नाही म्हणून ) असे.  S.T.Colony, लोकमान्य नगर आणि न्यू पंडित कॉलोनी. इथे ही त्यांचा मित्र परिवार सगळाच . त्यात - उगावकर लेले धूमणे डॉ अभिमन्यू पवार डॉ सोनावणे करमरकर येवला कोठावदे गुप्ता चावरे बस्ते आव्हाड ई. त्यांच्या मैत्रीसाठी वयोमर्यादा नव्हती. 
      एकदा आमच्या शेजारच्या येवला मावशी खूप आजारी पडल्या. तेव्हा नुकतीच डॉ मुथा यांच्याशी ओळख झाली होती. आई येवला मावशींना घेऊन dr मुथाकडे गेल्या . त्यांचा सर्व त्रास आईंनीच dr ला सांगितला. सर्व treatment झाल्यावर dr नी सहज विचारले कि , "तुम्ही यांच्या कोण ?" आई म्हणाल्या "शेजारी" dr. चाट च पडले. शेजारी असून येवला मावशींच्या आजाराची पूर्ण कल्पना होतीच शिवाय कोणकोणत्या dr ची treatment सुरु आहे / घेतली सर्वच आईंनी माहिती दिली होती. 


                                                                                                                                         (क्रमश:)
   








       


Tuesday, 19 July 2016

जीवनाचा झरा .....



                                                          पहाट सोनेरी किरणांची
                                                            नवीन आशेची नवीन विचारांची
                                                              एक स्वतंत्र आयुष्याची
                                                               जन्म अडतो अश्या मैत्रीवाचून
                                                                 गरज ही प्रत्येक जीवनाची.

                                                         मित्र हा असतो असा एक झरा
                                                           असतो ज्याकडे मनातील वसा
                                                            ज्याच्यावाचून खिडकीतून परततो
                                                                   गंध न घेता, वारा.

                                                        प्रत्येक घटनेचा इतिहास तो
                                                          पाउल टाके दाही दिशा
                                                            खाचखळग्यांवरूनी लोटांगण घाली
                                                              निस्वार्थ मैत्री हीच त्याची "शिधा"

                                                         व्यक्त करण्या आपल्या भावना
                                                           नसे गरज शब्दांची
                                                            अबोल डोळ्यातूनही वाचे
                                                             गरज आपल्या आयुष्याची.


काळोखात मिणमिणता दिवा ........

तुझी मैत्री आहे म्हणूनच
जगण्याची जिद्द आहे.
तुझ्या मैत्रीतून बाहेर पडले तर
लगेचच मरणाची हद्द आहे.

तुझी मैत्री आहे म्हणूनच
आयुष्याचा हा प्रवास आहे.
तुझ्या मैत्रीशिवाय
जगण्याचा नुसताच भास आहे.

तुझी मैत्री आहे म्हणूनच
तुझ्यासमोर दोन अश्रू ढाळू शकते.
वेड्या ह्या जगात
जगण्याची मर्यादा मी पाळू शकते.

तुझी मैत्री आहे .....
माझ्यासाठी काळोखातही मिणमिणता दिवा
जग जळत माझ्यावर
कारण माझ्याकडे तुझ्या मैत्रीचा ठेवा.



Tuesday, 5 July 2016

मला कळलेले मन ....

मनः सृष्टी ( The Centre For Psychological Development & Studies), पुणे तर्फे  "मला कळलेले मन ...!" ह्या विषयावर  निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. मनःसृष्टी ही संस्था मानसिक स्वास्थ्य संदर्भात समाजात जागृती निर्माण करण्याचे आणि प्रशिक्षण देण्याचे कार्य करते.  मन म्हणजे नेमके काय हे जर समजून घेता आले तर मानसिक स्वास्थ्य सुधारण्यासाठी नक्कीच मदत होऊ शकेल , असा विचार करून मनःसृष्टी संस्थेच्या वतीने निबंध स्पर्धेचे आयोजन केले होते. मानवी मन ह्या संकल्पनेवर विचार व्हावा ,वाचन व्हावे , मना संदर्भात ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न व्हावा आणि मनःस्वस्थ्याच्या दिशेने एक पाउल पुढे पडावे हे सदर स्पर्धेचे मुख्य उद्दिष्ट होते. स्पर्धेचे नियम :- 
१) शब्द मर्यादा ५०० ते १००० शब्द
२) निबंध स्वलिखित, अप्रकाशित आणि मराठी भाषेत लिहिलेला असावा.
३) ह्या स्पर्धेच्या निमित्ताने मनाचा अभ्यास असावा ही अपेक्षा असल्याने निबंधात  कुठल्याही पुस्तकातील मजकूर कॉपी करणे अपेक्षित नाही. निबंध स्वतःचे विचार अनुभव व अभ्यास ह्यावर आधारित असावा.
४) मानःशास्त्र विषयात काम करणारे व्यावसायिक व विद्यार्थी सोडून इतर सर्वांना स्पर्धेत भाग घेता येईल.

अशा स्पर्धेत भाग घेण्याची माझी पहिलीच वेळ !! तरीही माझ्या मैत्रिणीने माझ्यावर विश्वास दाखवून मला लिहिण्यास प्रोत्साहन दिले त्याबद्दल मी,  श्रीमती संगीता जाधव गिरमे चे मनापासून आभार मानते. आणि माझ्या सद्गुरू डॉ अनिरुद्ध (बापू) धैर्यधर जोशीकडून आजपर्यंत जे शिकले तेच लिहायचा प्रयास केला आहे. 

                                                        ...... मला कळलेले मन .....

"प्रेम आणि युद्धात सर्वच माफ असत.." असे आपण नेहेमीच म्हणतो. खरतर दोन्ही २ टोकाच्या गोष्टी !! प्रेम - नवजीवन देत, तर युद्ध जीवनाचा अंत करत. !! मग असे काय साम्य आहे दोघांत कि दोहोंमध्ये सगळच माफ असत? ...... कारण दोहोंमध्ये गुंतलय "मन " .

हेच मन - प्रेम / माया करत, हसत - रुसत - खेळवत, सुसाट धावत , चिडत , घायाळ होत , बंड पुकारून युद्ध करत, हळवे असल्याने माफही 'मन'च करत . आता तस पहिला गेलं तर आपल्या शरीरात "मनाची' विशिष्ट जागाच नाहीये, पण अस्तित्व १०८% आहेच - प्रत्येक प्राणीमात्रात !!

प्रेम आणि युद्ध बालवयापासूनच सुरु होते , म्हणजे जन्मापासून ते वय वर्ष १२ पर्यंतचा काळ हा 'घडवण्याचा ' काळ असतो ! जसा - कुंभार कच्च्या मातीपासून पक्का घडा बनवितो , त्याचप्रमाणे भोवताली घडणाऱ्या प्रत्येक हालचालींचे पडसाद बालमनावर पडून हळूहळू त्या मनातल्या कोपर्यात नकळत कोरल्या जातात नी त्यांचे परिणाम वय १२ नंतर दिसायला लागतात. मुलांचे मन निरागस असते, ज्यात कुठलाच भेदभाव नसतो . येणारा प्रत्येक क्षण नवाच असतो आणि त्यात , ही निरागस मने डुंबून जातात. ह्यांना प्रत्येक गोष्टीची तीव्र उत्सुकता असते. जसे वय वाढत जाते , तसे भोवतालच्या वातावरणाचा बालमनावर पगडा बसत जातो आणि त्याचा परिणाम पुढच्या हालचालींवर दिसू लागतो. अश्यावेळी घरातल्या मोठ्यांनी चुकीच्या गोष्टींना कौतुकाची झालर लावल्याने त्याचे नकळत दुष्परिणाम होऊन , 'मुले हाताबाहेर गेलीत' ...समजल्यावर मात्र , पालकांच्या पायाखालची जमीन सरकते !!

सेच सतत नकारात्मक वागणूक मिळाली कि आपलीच मुले आपल्यापासून मनाने दुरावतात - ती कायमचीच !! ह्यासाठी आवश्यकतेनुसार व परिस्थितीप्रमाणे - मुख्यतः मुलांची मने दुखावणार नाहीत ही काळजी घेतलीच पाहिजे . शिवाय ह्याच वयात वाटून घेणे ( sharing) ची सवय लावणे अत्त्यावश्यक , नाहीतर पुढे 'माझेपणा' टोकास जाऊन मुलांचे कायमस्वरूपी नुकसान होते. अति मवाळ, अति शिस्त घातक ! मुख्यतया , वेळच्या वेळी गोष्टी करण्याचे महत्व / कारण त्यांना पटवून दिले की त्यांनासुद्धा परिस्थितीनुसार वागायला मदतच होते. अश्यावेळी पालकांनी , माया थोडी बाजूला सारून स्वमनाला कणखर बनवले पाहिजे. तरच परिस्थिती हाताळणे सोपे जाऊन आपणच आपल्या बालकांचे हितचिंतक बनून, येणारा काळ सुखद जाण्यास त्यांना मदत करू शकतो.

पण एखाद्याचे मन बदलायला जातो - जे अशक्य आहे. कारण आपण स्वतहाच स्वतःचे मन बदलू शकत नाही तर , दुसर्यांबद्दल असा विचारदेखील चुकीचेच आहे ! मन - बदलणे नाही,  तर - जाणून घेणे व त्याप्रमाणे वागणे गरजेचे . शिवाय ह्याच वयात मनावर नियंत्रण ठेवायला शिकवणे महत्वाचे . विशिष्ट गोष्ट मिळाली नाही की बालमन हट्टी होते व हळूहळू त्याचे रुपांतर बंड आणि शेवटी युद्धात बदलते. अश्यावेळी स्वतःचे म्हणणे खरे करून घेण्यास काहीही करायला तयार होते व चुकून इतर कुणाकडून ह्या चुकीच्या गोष्टींसाठी मदत झाली तर , हे मूल भविष्यात चुकीच्या विचारांनी वाम मार्गाला लागू शकते.

न अत्तिशय कोमल , चंचल , निरागस असत. हे सतत हृदय व बुद्धी ला खेळवत रहात - त्यांच्यातलच बनून रहात. हृदय धडकत पण मन बोलतं. बुद्धी चालते पण मन धावत. मनाला सतत सावरायला लागत कारण , त्याच्यासारखे कलंदर व्हायला बुद्धी व हृदयाला खुप मेहेनत घ्यावी लागते . मन एकाच जागी स्थिर नसत, तर अक्षरशः एकाच वेळी १० ठिकाणी सुसाट पळत. अश्या ह्या बेफाम मनाला स्थिर करण्यासाठी त्याला ' रमवण्याची ' गरज असते, आणि हे जर बालवयातच घडले तर सक्षम सबल मन तयार होत. त्यासाठी मुलांना वाचण्याची आवड निर्माण करून योग्य पुस्तके वाचनाची मार्गदर्शन केल्यास , मन व बुद्धी एकत्र येऊन भरीव काम करतात, ज्यामुळे इतर क्षुल्लक गोष्टींकडे लक्ष जात नाही. शूरवीरांच्या कथा सांगितल्याने मुलांची विचारशक्ती वाढते व ते धाडसी बनतात. बौद्धिक व मैदानी खेळ मानसिक, शारीरिक व आकलन शक्ती वाढविते . तसेच देवावर विश्वासही तितकाच महत्वाचा. मुलांच्या उत्सुकतेला सकारात्मक प्रतिसाद दिल्याने , मनातले द्वंद्व कमी होऊन स्थिरता प्राप्त होण्यास मदत करते. मनःसामार्थ्य मिळते आणि येऊ घातलेल्या प्रत्येक क्षणाला हीच मन- बुद्धीची मैत्री जीवनाला सुंदर वळण देते. आणि ह्याच संगमामुळे , "माझे मन मला कळायला लागते."

ते धावत - पण सुसाट नाही तर आवश्यकतेनुसार आणि बेलगाम न राहता बुद्धीच्या छायेत राहून जीवन , साधे सरळ सोप्पे बनवते ! वाढत्या वयानुसार जीवनाची उद्दिष्ट्ये वाढत जातात - ह्यात अनेक वादळ समोर उभी राहतात , पण मन खंबीर झाल्याने ही वादळे मनावर कुठलाच नकारात्मक परिणाम न करता पुढील आयुष्यात उपयोगी पडणारे धडे शिकायला लागून , मनःपटलावर कोरायला लागत. मनाची व्यापकता - लांबी - रुंदी काहीच मोजता येत नाही म्हणूनच ते सतत वाहावत जात . मन खोडकर मिळाऊ मोहक विशाल असत , म्हणूनच मनाचे खेळ होतात , मनात मांडे रचतात , मन रुसत नाराज होत, पाखराप्रमाणे विहार करते.. ही सर्व मनाची रंग आहेत.

नाला बांध घालणे तसे कठीणच. मन कळायला स्वतःला तेवढा वेळ द्यावा लागतो - मग ते स्वतःचे असो व दुसर्याचे आणि आजच्या धकाधकीच्या जीवनात तर, मनासाठी वेळ काढावाच लागेल - थोड थांबाव च लागेल!
किशोर वयातले मन स्वतःच्या आवडीच्या ठिकाणी रमले कि हळूहळू त्याच्या छुप्या कला उलगडत जातात नि एक सुंदर विश्व तयार होते - आणि अगदी अलगदपणे , आधी जे अशक्य वाटत होत ते हळूहळू शक्य होत जात - सकारात्मक आकार घेत नव्याने त्याच्या विविध छटा दिसायला लागतात.

किशोर वय फार धोक्याचे म्हणतात. प्रत्येक ठिकाणी मन आधारासाठी धावत असत. म्हणूनच योग्यरित्या आवर घालता आला कि , मनावर होणार्या जख्मांपासून ते सुरक्षित राहते.


णि एक मात्र तितकच खरय कि , ज्याचा देवावर / श्रद्धास्थानावर विश्वास असतो , तेव्हा माझ्या (त्याच्या) मनाला खंबीर आधार मिळतो , ज्यामुळे माझ्या मनबुद्धीला जास्तीत जास्त सामर्थ्य मिळून मनावर लगाम लावता येतो. जेवढा दृढ विश्वास - तितकीच ताकत मिळते - मन बलवान करण्यासाठी .
हे बलवान मन कुठल्याही भ्रामक कल्पनेत न रमता वास्तवाशी हातमिळवणी करून , बुद्धीच्या सहाय्याने व श्रद्धास्थानाकडून मिळालेल्या उचित मार्गदर्शनाने , स्वावलंबी होऊन माझे वर्तमान व भविष्य सुसहय्य तर बनवतातच , त्याचबरोबर आखलेली उद्दिष्ट्ये यशस्वीरीत्या पार पाडून पुढील काळ सत्य, प्रेम व आनंदाने घालवण्यासाठी तयार होते.

र्मस्वातंत्र्याचा  उचित वापर करून एखादी गोष्ट करण्यामागे कारण, त्याची गरज व परिणाम जाणून असेल तर पुढील होणारा अनर्थ टळतो.
आणि मनाने माफ करायलाही शिकलाच पाहिजे . झाले गेले विसरून जाऊन योग्य धडे घेऊन कुठलाही गैरसमज न करता पुढे मार्गक्रमण करत राहायचे आणि "बंड" "द्वंद्वात" न अडकता जीवन सुखद बनते.

किशोर वय ते ६० वर्षांपर्यंतचा काळ संसारिक असतो आणि ह्यातच आपल्या मनाचा कस लागतो. मनावर ताबा ठेऊनच सुखाचा संसार होतो आणि ह्यामुळेच म्हातारपण आनंदात जाते.

त्यामुळे , अगदी बालवयातच मनाला उचित दिशा दाखवण्यास - मनाचा पक्का घडा बनवण्यास - संस्कारांचा लेप योग्यरीत्या चढवून , भोवतालच्या परिस्थितीचे पाणी वापरून  - मनाच्या चाकावर नियंत्रण ठेवण्यासाठी काठीचा उचित वापर करून मनाचा समतोल सांभाळत, त्रासदायक होणारी ज्यादाची माती - म्हणजे मनाचा समतोल ढाळणार्या गोष्टी काढून , उन्हात वाळवून म्हणजे - येणाऱ्या परिस्थितीस सामोरे जावून , श्रद्धा सबुरीचे रंग चढवून , तयार होणारा मानवी जीवनाचा पक्का घडा - येऊ घातलेल्या कुठल्याही परिस्थितीत स्वतःचे अस्तित्व ठामपणे टिकवून ठेवतो आणि इतरांची तृषा भागवण्यास सदुपयोगी पडतो.

ह्या पक्क्या घड्यास , परमेश्वररूपी तोटी लावल्यास मनातला मळ- ( ज्यादाचे पाणी ) वेळोवेळी काढून टाकण्यास सहाय्यच मिळून आयुष्य सुखी होते. !!!!



  
    

Wednesday, 29 June 2016

.....निदान स्वप्नात तरी ये माझ्या .....

दिवस सरून गेला , तरी आस तुझी आहे
खर्या खुर्या जगामध्ये , भास तुझा आहे
बस साथ हवी तुझी, मग फिकीर न जगाची
जवळ येऊन माझ्या, आस पुरी कर मनाची
आस लावून बसलेत डोळे, उगा वाटेकडे तुझ्या
खर खुर जमत नाही, निदान स्वप्नात तरी ये माझ्या..

गूढ त्या नजरेचं, जणू कोड होऊन गेलंय
लपलेलं ते उत्तर, पार तुझ्यात बुडून गेलंय
तू ये जवळ आज , निदान तेच देण्यासाठी
माझ्या डोळ्यांमध्ये तुला , साठवून घेण्यासाठी
झुरतय माझं मन , नुसत आठवणीतच  तुझ्या
खरं खुर जमत नाही, निदान स्वप्नात तरी ये माझ्या ..

प्रेमाचे ते वारे , पार तुफान होऊन गेलंय
सरळमार्गी वाटेला, त्याने दिशाहीन केलंय
भरकटलेली मी, तुझी वाट शोधते आहे
देवाकडे रोज , आता तुलाच मागते आहे
मग झुरत ठेऊन मला, अशी पाहू नकोस मजा
खरं खुर जमत नाही निदान स्वप्नात तरी ये माझ्या ..

भेटीसाठी तुझ्या, ते नभ वेडे झालेत
वाट बघता बघता , पार थोडे थोडे झालेत,
दुखावलेले नभ, माझ्या डोळ्यातून बारसतात
आस ठेऊन वेडी, तुझ्या येण्यासाठी तरसतात
ते नभ निर्दोष आहेत , मग त्यांना का देतोएस सजा
खरं खुर जमत नाही, निदान स्वप्नात तरी ये माझ्या..

वेळ नसेल तर,  वेळ काढून ये
जगाचे ते भेद, सारे तोडून तू ये
कमी असेन मी, तर तू पूर्ण करण्यासाठी ये
नेहेमीच जिंकलास तू, आज हरण्यासाठी ये
रोखत असेल पाश, त्याला मोडून तू ये
आठवण असेल माझी, निदान ती घेण्यासाठी ये
झोप हरवलेल्याला ,झोप देण्यासाठी ये

तुला भेटण्याचा, आता नाही दुवा दुजा
खरं खुर जमत नाही, निदान स्वप्नात तरी ये माझ्या ..


Sunday, 19 June 2016

नाशिकची बुलेट राणी !! - कल्याणी जोशी

श्री ज्योतिबा फुले व त्यांच्या पत्नी सौ सावित्रीबाई फुले ह्यांचे "प्रत्येक मुलगी शिकलीच पाहिजे " हे स्वप्न अतिशय कष्टाने व खडतर वाट चालून पूर्ण झाले. आणि त्यांच्यामुळेच, आजची स्त्री , फक्त "चूल व मूल" ह्यात न अडकता वेगवेगळ्या क्षेत्रातून पुरुषांच्या खांद्याला खांदा देऊन सक्षमपणे उभी आहे .

"प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्रीचा वाटा अस्तोसच" , असे म्हंटले जाते . मात्र यशस्वी होण्यास प्रत्येक स्त्रीला घरच्यांची साथ मिळणे फारच गरजेचे व महत्वाचे !! लग्नानंतर सासू -सासरे व पती आणि मुलं,  ह्यांचा सतत पाठींबा मिळणे का फारच महत्वाचे असते - ह्याचे ताजे उदाहरण म्हणजे - नाशिकच्या सौ. कल्याणी विश्वास जोशी (पूर्वीची कल्याणी सौदाणकर  )

कल्याणी मुळची नाशिकची . सारडा कन्या विद्यालय व बी वाय के कॉलेज ची विद्यार्थिनी . पती - श्री विश्वास जोशी ह्यांची स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये बदलीची नौकरी , सासू-सासरे नाशिक मध्ये स्थायिक , मुलाचे संगोपन व शिक्षण अशी तारेवरची कसरत करत , कल्याणी टी.व्ही , रेडीओ, Documentary Films आणि News Channels वर Voice Overचे सुद्धा काम करते; ह्याशिवाय सहज सोप्या भाषेत कविता व शायरी सुद्धा !!

एकदा नाशिकला त्यांच्या घरी , त्यांचे एक मित्र Bullet वर त्यांना भेटायला आले असता , कल्याणीला त्या वाहनाने आकर्षित करून मोहात पाडले आणि त्यांची परवानगी घेऊन कल्याणी गाडीशी खेळू लागली आणि तिचे हे Bullet प्रेम विश्वासरावांच्या लक्षात आल्यावाचून राहिले नाही!!

सध्या श्री व सौ जोशी मुंबईत स्थायिक आहेत. इथेच Road Bullet Stallions,विले पार्ले ह्या Groupशी कल्याणीची ओळख झाली. Bulletने कल्याणीला आकर्षित केले व तिच्या ह्या आगळ्या वेगळ्या प्रेमाला - ROYAL ENFIELD ची THUNDERBIRD 350 cc ही Bullet घेऊन श्री विश्वासरावनी जणू पावतीच दिली !! आणि अशा रीतीने सुरु झाला नाशिकच्या बुलेट राणीचा नवा प्रवास !!

नाशिक शहरातले रस्ते, आसपासचे घाट - त्यातील अवघड वळणे, चढ-उतार , रात्रीच्या वेळी समोरून येणाऱ्या गाड्यांचे प्रकाशझोत आणि त्यात Royal Enfield चे Thunderbird 350 हे अवजड वाहन (१९२ किलोग्राम वजन) !! त्यावर स्वतःचा ताबा , गाडीचा तोल सांभाळत , काही बिघाड झाले असता ते दुरुस्त करणे असे सर्वकाही अवघ्या थोड्याच दिवसात कल्याणी शिकलीसुद्धा !! विना गेअरच्या अनेक गाड्या आणि चारचाकी चालवायची सवय तर आहेच , तरीसुद्धा , ThunderBird 350 ची बातच काही और आहे !
अश्यातच गेल्या वर्षी नाशिकच्या Bullet Queens कार्यक्रमात सहभाग घेऊन कल्याणीचा आत्मविश्वास वाढला आणि थोड्याच दिवसात Royal Enfield तर्फे Riders Mania चा Goa येथे दरवर्षी होणार्या सोहोळ्यात भाग घेण्याची सुवर्णसंधी चालून आली. २१-२३ नोव्हेंबर २०१५ , Vagator Beach, Goa येथे हा सोहोळा होता. त्यात भारतात्तून तब्बल ३००० Bulletiers सामील झाले . Road Bullet Stallions , मुंबईतून ४५ Bulletiersचा सहभाग होता , ज्यात विले पार्लेमधून १७ सभासद होते. ह्या टीम मध्ये १६ पुरुष व १ महिला होते ; आणि ही एकमेव महिला पटकावणयाचा बहुमान नाशिकच्या कल्याणी जोशीला मिळाला !!

मुंबई - गोवा - मुंबई हा तब्बल १५०० किलोमीटरचा प्रवास १८ नोव्हेंबर ला सकाळी ६ वाजता निघाले व ६५० किलोमीटर एका बाजूचा प्रवास करून १४ तासात गोव्याला पोहोचले!! कल्याणी सांगते कि ह्या प्रवासात फक्त दुपारी आणि रात्रीच्या जेवणासाठीच विश्रांती घेतली . आणि विशेष म्हणजे ह्या संपूर्ण प्रवासात तिच्या सहकाऱ्यांनी खूपच छान साथ दिली . कल्याणीच्याच शब्दात, " ह्या पूर्ण प्रवासात एक  Bullet Rider म्हणूनच मला गणले गेले. ह्यात स्त्री पुरुष असा भेदभाव नसतोच"
विशेष म्हणजे कल्याणी ने ह्या मोहिमेची सुरुवात आपल्या नाशिकच्या घरापासून केली. म्हणजेच नाशिक - मुंबई-गोवा - मुंबई - नाशिक असा पल्ला यशस्वीरीत्या पार पाडला.

गोव्याला जातांना चिपळूण मार्गे आणि परतीचा प्रवास सातारा, Ambeghat, पुणे असा होता. तिच्याच शब्दात ..... " गोव्याला जाताना सहयाद्रीचा घाट लागला आणि आजूबाजूला घनदाट जंगल!! जंगलातून प्रवास करण्याची ही पहिलीच वेळ आणि ती ही चक्क बुलेट वर !! इथे बिबटे असतात जे वाहनांच्या प्रकाश्झोतामागे ५५ किलोमीटर ताशीच्या वेगाने पाठलाग करतात असे ऐकले होते. नशीब कुठेही बिबटे महाराज आडवे आले नाहीत!! " असे खळखळून हसत सांगते . "आम्ही जंगलात शिरलो आणि १० किलोमीटर आत गेल्यावर आपण रस्ता चुकलो आहोत असे लक्षात आले!! तरीसुद्धा हिम्मत न हारता मागे फिरलो आणि मुख्य रस्त्याला लागलो. घाटातला थरारक प्रवास अनेकवेळा एकेरीच होता !! एका बाजूला समोरून येणाऱ्या गाड्या आणि दुसर्या बाजूला खोल दरी अशी परीक्षा होती !
रस्त्यावर अनेक जणांनी टाळ्या वाजवून स्वागत केले व एक बाई बुलेट चालावात्ये आहे हे पाहून त्यांच्या चेहेर्यांवर आश्चर्यमिश्रीत भाव होते !! असेच एका सिग्नल वर थांबलेलो असता , एक चिमुरडा जवळ आला आणि , "ह्ये चालवताय तर ह्ये सुद्धा चालवा कि......" असे म्हणत आधी माझ्या बुलेटकडे नंतर हातातल्या विमानाकडे बोट दाखवून निरागसतेने म्हणाला. त्याचा भोळा भाव पाहून हसू आले.

गोव्यात पोहोचल्यावर आम्ही एका ठिकाणी जरा थांबलो. मी माझ्या सहकाऱ्यांना सहज विचारले कि अजून किती वेळ आहे गोव्याला पोहोचायला ? " कल्याणीजी आपण गोव्यातच आहोत आत्ता " हे ऐकल्यावर माझ्या आनंदाला पारावार राहिला नाही. कारण गोवा बघायची ही माझी अगदी पहिलीच वेळ होती आणि तीही मी माझ्या बुलेटवर आले !! बुलेटचा पहिला लांबचा प्रवास आणि माझीदेखील गोवाची पहिली भेट !! तो आनंद .... ते क्षण .... अवर्णनीय आहेत.!! शब्दच नाहीत तो आनंद सांगायला !! आणि त्यातही सुखद धक्का म्हणजे  - माझ्या ह्या आनंदाला द्विगुणीत केले माझ्या पतीनी!! ते स्वतः माझ्या आनंदात सामील होण्यास  तिथे गोव्याला आले !!

मुंबईत पोहोचल्यावर कल्याणी आपल्या टीम ला सोडून नाशिकच्या प्रवासास निघाली आणि तब्बल १३०० किलोमीटरचा मुंबई - गोवा - मुंबई मोहिमेची यशस्वी सांगता , आपल्या स्वगृही पोहोचून निर्विघ्नपणे पार पाडली.
" माझ्या ह्या यशस्वी मोहिमेत माझे पती व मुलगा ह्यांची पाहिल्यापासुनची साथ, मित्र मैत्रिणींचा उत्स्फूर्त पाठींबा आणि घरच्या सर्व मोठ्यांचा आशीर्वाद आहे ," असे कल्याणी आवर्जून सांगते.

कल्याणी जोशी ने नाशिक - मुंबई - गोवा - मुंबई - नाशिक हा थरारक व खडतर प्रवास Royal Enfield च्या Thunderbird 350 cc ह्या बुलेटवरून यशस्वीरीत्या निर्विघ्न पार पाडला आहे आणि म्हणूनच ती खर्या अर्थाने " नाशिक ची Bullet Queen ठरली आहे . शिवाय  नाशिकला मानाचे स्थान मिळवून दिले आहे. अश्या प्रकारची मोहीम फत्ते करणारी नाशिक बुलेट राणी हा खिताब मिळवणारी कल्याणी , पहिली महिला ठरली आहे ."