Wednesday, 15 March 2017

..... खचणार नाही - कारण ....

आयुष्याच्या वाटेवर चालताना आपण विविध लोकांच्या संपर्कात येतो . मागच्या महिन्यात अशीच एक जूनी मैत्रीण मला भेटली असता आमच्यात गप्पा रंगल्या आणि साहजिकच आमचा विषय सद्गुरुंवर येऊन थांबला. ती ज़रा बिचकुन घाबरतच बोलत होती ह्या विषयावर. नुकतेच माझ्या पतींचे - राहुलसिंह संत यांच्या tongue cancer बद्दल बोललो आणि हे ऐकून ती चाटच पडली कारण मी तिच्या प्रश्नांना अतिशय शांतपणे उत्तर देत होते . आणि तिने मला एक प्रश्न विचारला की, "तुझ्या अडचणीतसुद्धा खचत कशी नाहीस ?".    तिला मी त्यावेळी उत्तर  तर दिलच पण नंतर मात्र आजपर्यंतचे सर्व जीवन एक फ्लैशबैकसारख समोर दिसल आणि माझा , माझ्या सद्गुरुंवर माझ्या अडचणींमध्येसुद्धा इतका विश्वास का आहे हा विचार करत असतांना , त्यातूनच काही ओळी सुचल्या त्या अश्या ......

हे सदगुरूराया हे नंदारमणा ....


हे सदगुरूराया हे नंदारमणा 
तूच माझा कर्ता हर्ता रक्षणकर्ता .
     मजसाठी जे जे उचित 
     देतोसच तू निश्चित ,
    खचणार नाही - कारण....
    मी हे जाणत ,
तूच माझा कर्ता हर्ता रक्षणकर्ता .  
     केलेले प्रयत्न होतात व्यर्थ 
     आत्मबल शिकवून 
     मनासी करतोस समर्थ 
     खचणार नाही - कारण....
     मी हे जाणत ,
तूच माझा कर्ता हर्ता रक्षणकर्ता .
    प्रयासास माझ्या देऊनि बळ 
     विजयाची वाट दावतोस निश्चळ 
     सत्यप्रेमानंदाचा तू महासागर 
     तव प्रेम कृपा अपरंपार 
     ग्वाही तुझी पदोपदी आळवत ,
"तू आणि मी मिळून पाहि , अशक्य ऐसे काहीही नाही "
खचणार नाही - कारण...
     मी हे जाणत ,
तूच माझा कर्ता हर्ता रक्षणकर्ता .
हे सदगुरूराया हे नंदारमणा 
तूच माझा कर्ता हर्ता रक्षणकर्ता . 

मी अम्बद्न्य आहे 
     


     

    

Wednesday, 16 November 2016

उदार कल्पतरू अर्थात सद्गुरू चरित्र ...भाग १४ ..

उदार कल्पतरू
विज्ञान कार्य प्रसार

लेखक:- दिनकर यादवराव मार्डीकर

      सतगुरू निजानंद चैतन्य यांचे पार्थिव शरीर अष्टधा प्रकृतीत विलीन झाल्यामुळे डॉ संतांना अपरिमित मानस वेदना झाल्या व काही काळपर्यंत ते उदासीन व संथ असत. परंतु या त्यांच्या दशेत सद्गुरू ज्ञान प्रकाशामुळे लौकरच  परिवर्तन होऊन ते आपले वर्ण कर्म करण्यास प्रवृत्त झाले. 
       बिलासपूरच्या डॉ संतांच्या वास्तव्यात तेथे त्यांनी भगवान मायानंद चैतन्यांनी स्थापित केलेल्या विश्वधर्म प्रचाराचे भरीव कार्य केले. स्वराच्या नंदस्वामी विज्ञान शाळेचे संचालक असताना त्याच्या मदतीला ते दोन वेळा प्रचारार्थ गेले होते.  स्थापन झालेल्या एस.बी.आर कॉलेज मध्ये व सार्वजनिक रित्या त्यांची अनेक प्रभावी  प्रवचने झाली. मुंगेलीलाही त्यांच्या मदतीने श्री प्र.वि.भागवत यांच्या संचालकत्वाखाली विज्ञाननौका कार्यालय स्थापन झाले , व तेथे अनेक प्रभावी प्रचारक निर्माण झाले. त्यांच्यापैकी श्री रामलाल सोनी, श्री त्रिवेदी , श्री बटुकलाल इत्यादी हे प्रमुख होते. श्री स्वराज्यानंद ब्रह्मीभूत झाल्यानंतर द्वितीय संचालक श्री आनंद चैतन्यही बिलासपुरास आले असतांना बरेच मोठे प्रचार कार्य झाले.
      डॉ संतांच्या सामाजिक कार्याच्या बहुविध क्षेत्रातील प्रेमामुळे ते तेथील एस.बी.आर कॉलेज च्या गव्हर्निंग बॉडी चे उपसभापती होऊन त्यांनी येथेही लोककल्याणकारी लोकप्रियता मिळवली होती. त्यामुळे ज.गु.आनंद चैतन्य ह्यांच्या प्रचारकार्यास अधिकाधिक आधुनिक शिक्षित वर्गाची सहानुभूती मिळाली होती. डॉ आनंद चैतन्याच्या संशोधित, " आद्य गीता" च्या प्रकाशनासाठी डॉ संतांच्या प्रयत्नांनी तेथील श्रीमंत व्यापारी श्री किसनलाल चतुर्वेदी यांनी बरीच आर्थिक मदत स्वखुशीने केली. त्यांचा , "आद्य भारत" ग्रंथ प्रकाशनार्थ डॉ संतांच्या एक मित्र डॉक्टरांनी एक हजार रुपयांची देणगी आनंदाने दिली. डॉ संतांच्या इतर क्षेत्रातील बहुरंगी यशस्वी कर्तबगारीचा सक्रिय वाटा व त्यांनी प्रविष्ट केलेल्या विश्वधर्म प्रचाराच्या करायासही ठोस रीतीने मिळू लागला. त्यांचे हे कार्य इ. स. १९५६ मध्ये जेव्हा विज्ञान शाळेचे संचालक श्री डॉ आनंद चैतन्य ब्रह्मीभूत झाले तेव्हा त्यांनी आपल्या मृत्युपत्रात , विज्ञानशाळा ओंकारमांधाता येथील केंद्रीय संस्थेचे संचालकत्वाचे महत्वपूर्ण कार्य करावे असे लिहून माहे मे १९५६ मध्ये ते पंचमढी मध्यप्रांत येथे ब्रह्मीभूत झाले.

(क्रमशः)  

Friday, 11 November 2016

उदार कल्पतरू अर्थात सद्गुरू चरित्र ...भाग १३ ..

उदार कल्पतरू
सद्गुरुप्राप्ती

लेखक दिनकर यादवराव मार्डीकर

      डॉ संत हे विभूतींच्या श्रेणी मध्ये येतात असे म्हणणे अयोग्य ठरणार नाही . त्यांचे अंगी प्रसंगयुक्त अनेक गुण होते. ते नेहेमी सार्वजनिक कार्यात अग्रेसर होऊन भाग घेत असत व आपली जबाबदारी अति कौशल्याने अविश्रांत श्रम करून पार पाडत असत. वक्तृत्व कलेवर त्यांचे प्रभुत्व होते. बिलासपूरच्या सार्वजनिक गणेश उत्सवात जेव्हा अनेक विषयांवर परिसंवाद घडून येत, त्यात पूर्वपक्ष व उत्तर पक्षीय वक्ते म्हणून भाग घेण्याचा आग्रह मंडळींतर्फे होत असे. ह्याचे कारण म्हणजे कलाप्रवीण बुद्धीचातुर्य व कर्म कौशल्य . त्यांच्या खाजगी जीवनात ते जसे कट्टर मातृ व पितृ भक्त असत तसेच ते ईश्वरभक्तही होते. पण वादविवादासाठी ते मुद्दामच नास्तिकवादाचे समर्थन करणाऱ्या पक्षात भाग घेत असत. ह्या गोष्टीचा मुद्दाम उल्लेख करण्याचे कारण हेच, कि त्यांच्या सार्वजनिक वादविवादात वास्तविक मताचे समर्थन करण्याच्या प्रथेमुळे , इ.स . १९४३ मध्ये पुढे अशी घटना घडली  कि जी मुळे त्यांच्या भावी आयुष्याला एक अगदीच निराळे वळण लागले.
      ती इ स १९४३ ची घटना पुढील प्रमाणे -
ईश्वराच्या अस्तित्ववादाबद्दल नेहेमी बाजू मांडून भाग घेणारे डॉ संतांचे एक मित्र होते - त्यांचे नाव ब्रजभूषण सिरोटीया असे होते. ते एके दिवशी संतांकडे त्यांना प्रवचनाचे निमंत्रण देण्यास आले व त्यांना महामहोपाध्याय बी.जगन्नाथ यांचे घरी येण्यास आग्रह करू लागले. कारण हे प्रवचनकार ब्रजभूषणचे मित्र होते, तसेच कुशल वक्तेदेखील होते. डॉ संत हे जरी पूर्ण आस्तिक्यवादी होते, आणि ते ज्ञानेश्वरी, गीता, दासबोध, रामायण, भागवत, वेदांत इत्यादींचा नेहेमी सूक्ष्म अभ्यास करत असत, तरीपण धार्मिकतेचे प्रदर्शन आपल्या आचरणात करण्याचा त्यांना अत्यंत तिरस्कार वाटत असे.
      डॉ संतांच्या मातोश्री ह्या फारच धर्मनिष्ठ असल्यामुळे , गजानन महाराज , मोरगावकर बोवा, नारायण महाराज, केडगावकर उपासनी महाराज इत्यादी प्रख्यात साधुसंतांशी त्यांचा घनिष्ठ परिचय झालेला असे. परंतु, हेसर्व होत असतांना देखील डॉ संतांची निष्ठा , अध्यात्मिक विषयांची अभ्यासू पण साधुसंतांच्या संगतीत रमत नसे. श्री सिरोटियांना डॉ संतांनी उत्तर दिले की, अशी अनेक प्रवचने त्यांनी ऐकलेली आहेत. रोगी लोकांची सेवा टाकून असल्या प्रवचनश्रवणात काळक्षेपण करणे व्यर्थ ठरेल. ते योग्य नाही. म्हणून त्यांनी येण्याचे नाकबूल केले.
      यावर श्री सिरोटीया पुन्हा म्हणाले की, हे मामुली प्रवचन नसून , माझे मित्र तुम्हाला व इतरांना प्रत्यक्ष व यथार्थ परमेश्वराचे दर्शन घडवतील. हे ऐकून, डॉ संतांनी त्यांची खूपच थट्टा केली. परंतू श्री सिरोटीया जेव्हा आपला आग्रह सोडेना तेव्हा डॉ संत नाईलाजास्तव प्रवचनास गेले. हे प्रवचनकार म्हणजे, श्री तुलशंकर पाठक (निजानंद चैतन्य ) होत.
      प्रवचनात गावातील ३० किंवा ३५ प्रमुख निमंत्रित शिष्ठ सज्जन हजर होते. श्री तुलशंकर पाठक यांनी बत्तासे ठेऊन अधिष्ठानाची मांडणी केली. श्री कृष्णाने अर्जुनास दिव्यचक्षु कसे दिले ह्याची प्रायोगिक प्रक्रिया थोडक्यात समजावून दिली. प्रवचनानंतर सर्व श्रोते आपापल्या घरी निघून गेले होते. परंतु डॉ संत तिथेच बसून राहिले. त्यांचा व श्री तुलशंकर पाठक यांचा खालील प्रमाणे अल्पसंवाद झाला तो असा -
डॉ संत - महाशय, मै आपको ३ प्रश्न पूछना चाहता हूं , क्या आप उनका उत्तर दे सकेंगे ?
श्री पाठक - हां , जरूर पुछीये . मै कोशिश करके आपके सब प्रश्नो का जवाब दूगा.
डॉ संत - आपका प्रवचन सुनकर मुझे ऐसा कूछ स्वानुभव हुआ है कि , असे शब्दो में आपको बताने में मुझे बहोत कठीनाई प्रतीत हो राही हैं l परंतु मेरे शंकाओ का समाधान हुए बिना मुझे चैन नहीं मिलेगा l
 श्री पाठक - डॉक्टरजी आप अपनी सब शंकाए प्रगट कर शकते है l ठिक है ; आपके ३ प्रश्न कौनसे है , काहीये l
डॉ संत -" आपका प्रवचन प्रयोग के साथ मैने सुना , जो कूछ मैने आजतक परमात्मा के विषय में पढा या सुना था , वह सब उलथ पुलथ हो गया है l परमात्मा को पाने के लिये मैने जो कुछ परंपरागत तथा सुने हुए प्रयत्न किये थे, वे सब निरर्थक , कष्टप्रद तथा अविश्वसनीय हुए ऐसा मालूम पडता है l परंतु अभि जो आपने स्वानुभव प्रदान किया , उससे मुझे यह प्रतीत होता है , कि इस विश्व में परमात्मा नाम की कोई अन्य वस्तू न होकर सर्वत्र मै हि मै ओतप्रोत भरा हुआ हूं l सिवा मेरे अन्य जड तथा चैतन्य वस्तू कोई भी नहीं है l अब यह बताईए , की यह मेरा अनुभव आजतक हुए महात्माओने परंपरागत स्वीकृत अनुभवोसे कितना निराला और विलक्षण हैं l तो फिर निवेदन किजिये कि क्या सचमुचही मेरा अनुभव यथार्थ है, या मुझे कुछ भ्रम तो हुआ नहीं l "
      ह्या वेळी सभागृहात फक्त श्री पाठक व डॉ संत हे दोघेच होते l त्यांच्या शिवाय तिथे कोणीच नव्हते व ते दोघे हि जवळ जवळ मांडी घालून बसले होते.
श्री पाठक - " डॉ संतजी आपका यह स्वानुभव बिलकुल ठीक है l वह भ्रम नहीं , आप ऐसे सच मानिये  l यह आपकी प्रतितीही परमात्मा के बारे में अतिउच्च और सत्य साक्षात्कार है l "
      हे उत्तर ऐकून डॉ संत मनावस्थेच्या उच्च स्तरात इतके तल्लीन झाले कि, त्यांना कशाचेच भान राहिले नाही. या अवस्थेस तुर्या, उन्मनी वगैरे काय म्हणावे हे , त्यांचे त्यांना समजेनाl अशा अवस्थेत किती काळ गेला , कोणास माहित पण त्यांना श्री पाठकजींना देहभानावर आणावे लागले l
श्री पाठक -  (डॉ संत ची मांडी हलवून म्हणतात ) " डॉक्टरसाहेब आपके दो प्रश्न अथवा शंकाये कौनसी हैं पुछीये."
 डॉ संत - "हमारे अब कोई प्रश्न बाकी नहीं है और शंका भी नहीं है l" असे म्हणून डॉ संत अतिहर्षानें गदगदीत होऊन पाठकजीच्या चरणी दंडवत करून हुंदके देऊन रडू लागले.
 श्री पाठक - "डॉक्टरजी , आपको क्या कष्ट हो रहा है ?"
डॉ संत - "कष्ट तो इस बात का है कि , हिसके पूर्व का मेरा सब जीवन व्यर्थ गया इष्क दुःख हो राहा है l यादी जो वस्तू आपने मुझे प्रदान की वह कुछ वर्ष पूर्व मुझे प्राप्त होती तो मैं इस हीन संशय सागर में डुबकीया लागाते न रहेताl "
 श्री पाठक -"अब यह खेद करना अयोग्य है । किस समय क्या होगा कोई नहीं जानता ।सब होनहार ईश्वर प्रेरित और नियमित है । सब घटनाये योगायोग के स्वाधीन है । हो सकता है कि आपके जीवन का यह प्रसंग आपके पूर्बसंचित और तपश्चर्या का फल हो । मेरा याही आपको आशीर्वाद है की इस स्वानुभव में आप सदा के लिये स्थित राहे ।"
      तेव्हापासून जन्मजन्मांतरांपासूनचे हरपलेले निजस्वरूपाचे निजधन सापडलेल्या परमानंदाच्या स्थितीत राहून डॉ संत आपले सर्व कौटुंबिक , सामाजिक व जागतिक व्यवहारात सहज समाधीच्या स्थितीत वागू लागले.
      डॉ संतांचे सद्गुरू श्री तुलाशंकर पाठक उपाख्य श्री निजानंद चैतन्य हे पृवीचे मध्यप्रदेशातील सागर शहराचे रहिवासी होते. आंग्लभाषा विभूषित बी.एस.सी पदवीधर होते. यांचा असाच  परिचय स्वामी श्री स्वराज्यानंदाशी अनेक वर्षांपूर्वी झाला होता. तो प्रसंग देखील सर्वांगयोग युक्त प्रायोगिक प्रक्रियेच्या प्रवचनाचा होता.
भगवान मायानंद चैतन्य प्रस्थापित विज्ञानशाला ओंकारमांधाता येथे , श्री पाठक ६ महिने राहिले होते. व नित्य श्री स्वराज्यनिंदाशी या विषयांची चर्चा होत असे.
      म्हंणून हा विषय त्यांनी इतका आत्मसात केला होता., कि त्यांनी सर्व सांसारिक महत्वाकांक्षांना तिलांजली देऊन, ते भगवान श्री मायानंद चैतन्याच्या औप धर्म म्हणजे विश्वधर्माचे स्वयंसिद्ध व एकनिष्ठ प्रचारक बनले. ते बिलासपूर कटनी रेल्वे मार्गावर असलेल्या शहडोल या गावी राहत असत.
उदरपोषणार्थ त्यांनी या गावी एक ऑइल मिल चालवली होती. व याच मिळकतीवर ते आपला निर्वाह करीत असत. त्यानिमित्ताने ते मधून मधून बिलासपूरी येत असत आणि, शक्य असेल तेव्हा विश्वधर्म प्रचाराचे कार्य करीत असत. अश्या रीतीने त्यांचा व डॉ संतांचा दृढ परिचय झाला व, डॉ संत ह्यांना श्री निजानंदचैतन्य सारख्या सद्गुरूच्या कृपेने दिव्याचाचक्षु बोधामृत प्राप्त होऊन ते देखील श्री मायानंद चैतन्य प्रणित विश्वधर्माचे कट्टर अनुयायी बनले.
      बिलासपुरात त्यांनी विज्ञान नौका कार्यालय स्थापून , आपला सांसारिक व्याप सांभाळून अनेक अनुयायी बनवले भगवान मायानंद चैतन्यांनी दिलेल्या अनेक औषधर्म प्रकाशक ग्रंथ मिळवून त्यांनी सूक्ष्म अभ्यास लगेच सुरु केला. दरवर्षीच्या बुद्धजयंतीच्या विज्ञान संम्लेअनास र्व ओंकारमांधाता येथे हि जाऊ लागलं.ए तिथे त्यांनी, संचालक स्वराज्यानंद व अनेक प्रमुख विज्ञान जणांशी परिचय करून घेतला.
      श्री निजानंद चैतन्य मात्र आपल्या पर्या शिष्याचे (डॉ संत) हे परमसुख व कौतुक पाहावयास जास्त दिवस जिवंत राहिले नाहीत. त्यांना एक बिमारी होती.. ती, पुढे विज्ञान प्रचाराच्या परिश्रमामुळे वाढत गेली. म्हंणून त्यांना उपचारासाठी मुंबईत के. ई. एम रुग्णालयात जावे लागले. तेथील प्रख्यात सज्जन डॉ फडके हे, निजानंद चैतन्याचे ऑपेरेशन करणार होते. परंतु ऑपेरेशन होण्या पूर्वीच त्यांचा आजार वाढला व त्यांचे शरीर अष्टधा प्रकृतीतीत विलीन झाले.  यापूर्वी,त्यांनी डॉ संतांना एक महत्वपूर्ण पात्र लिहिले होते, जे कि विज्ञान पत्रिकेत प्रकाशित झाले आहे. त्यावरून त्यांचा व डॉ संतांचाही अध्यात्म क्षेत्रातील अधिकार किती उच्च प्रतीचा होते ह्याचे स्पष्टीकरण होते.

(क्रमशः )

Monday, 7 November 2016

उदार कल्पतरू अर्थात सद्गुरू चरित्र ...भाग १२ ...


उदार कल्पतरू ... 
दोन कौटुंबिक घटना 

लेखक - श्री दिनकर यादवराव मार्डीकर

      बिलासपूरच्या डॉ संतांच्या इ. स. १९२४ मध्ये सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन खाजगी प्रॅक्टिस सुरु कारण्यापूर्वीच्या वास्तव्यात त्यांच्या कौटुंबिक जीवनात ज्या अनेक घटना घडल्या त्यापैकी, दोन विशेष उल्लेखनीय आहेत.
      पहिली घटना अत्यंत हृदयविदारक होती. त्यांना दोन बंधू होते. एकाचे वय १२ वर्षे व दुसऱ्याचे ८ वर्षाचे होते. ही दोन्हीही मुले एक ८ दिवसात घटसर्पाच्या आजारामुळे दिवंगत झाली. आधीच ते प्रथम पत्नीच्या निधनामुळे अति दुःखी व कष्टी होते. परंतु आपल्या मातृभक्तीला  प्रेरित होऊन त्यांनी द्वितीय संबंध केला व आपले स्वतःचे सर्व प्रकारचे दुःख गिळून उत्तम प्रकारे संसार करीत असतांना, ही दुर्दैवी घटना झाली. ह्या प्रसंगी त्यांच्या दुःखाची परिसीमा लोटली. परंतु यत्किंचितही आपल्या कर्ममार्गापासून डॉ संत डळमळले नाहीत.
      डॉ संतांचे घर म्हणजे त्यांच्या बहिणी व इतर नातेवाईकांना सर्व अडीअडचणीच्या प्रसंगी एकमेव आश्रयस्थान असे. कुटुंबातील सर्व लोकांना , इतकेच नव्हे तर मित्र व ओळखीच्या लोकांना, सर्वपरीने सुखी ठेवण्यात त्यांनी कधीच हेळसांड केली नाही. प्रथम पत्नीच्या निधनाचे दुःख व नंतर लगेच दोघेही बंधू निवर्तल्याचे दुःख त्यांना फारच जाणवले. अंतर्यामीच्या शोकाच्या उर्मी हृदयात बाळगुन वरपांगी सर्वांच्या सुखाकरिता आपणही सुखी आहोत, असे दाखवणे , अविश्रांत परिश्रम करून काळजीपूर्वक स्वतःहाचा डॉक्टरकीचा खाजगी व्यवसाय  चालवणे,व सर्वांचे आदरातिथ्य करून घराची व कुटुंबाची काळजी वाहणे , इत्यादींचा त्यांच्या शरीर प्रकृर्तीवर परिणामही झाला. सन १९२६ पासून त्यांना मधुमेहाचा विकार जडला आणि मधून मधून हृदयातही कळा येऊ लागल्या अशी परिस्थिती झाली.
      नंतर एक आनंददायक घटना अशी घडली कि , आपल्या सख्ख्या बहिणीहून अधिक जास्त प्रिय असलेली मामेबहीण , तिच्या मातेचे देहावसान झाल्याने , तिच्या लग्नाची सर्व जबाबदारी डॉक्टरांकडे होती. त्यांनी तिचे लग्न जमवून आणले कारण ती त्यांच्याच कुटुंबात वाढत होती. तिचे मूळचे नाव सीता व सासरचे चंद्रिका असे होते. तिचे वडील श्री वामनराव सुदुंब्रेकर ह्यांनी त्यांच्या मृत्यूसमयी , डॉ संतांना बोलवून चंद्रिकेच्या विवाहाची सारी जबाबदारी त्यांचेवर सोपविले होती. चंद्रिकेची सावत्र आई माईसाहेब हि मुंबईस राहत असे. तिने हि डॉ संतांनी अंगिकारलेल्या जबाब्दारीस अनुमती दिलेली होती.
      माझे (लेखक), नागपूरचे विश्वविद्यालयीन शिक्षण चालू होते. माझे वडील यादवराव व मातोश्री सौ राधाबाई, वडील बंधू वगैरे कुटुंबातील मंडळी बिलासपूरलाच राहात असे. डॉ संतांचे आमच्या घरी नेहेमीच येणे जाणे होते, आणि दोन्ही कुटुंबात बराच घरोबा निर्माण झाला होता. कॉलेजच्या सुट्टीमध्ये मी, नागपूरहून घरी आलेलो असतांना डॉ संतांनी मला पहिले. व दुसऱ्या दिवशी मी घरी नसतांना , डॉ संत माझ्या वडिलांना भेटून चंद्रिकेसाठी माझ्या वडिलांजवळ माझी मागणी घातली. परस्पर कुटुंबाची माहिती व औपचारिक बोलणी झाल्यावर माझ्या वडिलांनी त्यांना  विचारिले,"तुमची बहीण दिसायला कशी काय आहे ?" त्यावर डॉ संतांनी उत्तर दिले, "थोडक्यात सांगायचे म्हणजे राजघराण्यात शोभेल इतकी सुंदर आहे. " माझ्या वडिलांचा डॉ संताच्या वचनावर एकदम विश्वास बसून माझे लग्न ठरले. लौकरच इतर बाबतीतले बोलणे होऊन, हे लग्न मुंबई मुक्कामी करण्याचे निश्चित झाले आणि तिथीदेखील ठरविण्यात आली. परंतु एक अनपेक्षित अडचण यात उत्पन्न झाली. चंद्रिकेच्या स्वतंत्र मातेशी व काकांशी आमचा किंचितही परिचय नव्हता . लग्न ठरविण्यापासून निर्विघ्न पार पडण्याची जबाबदारी डॉ संतांनी घेतली होती. ते त्यावेळच्या सिव्हिल सर्जनच्या हाताखाली सरकारी नोकरीत होते. लग्नासाठी डॉ संतांनी १० दिवसाची रजा मागितली होती . परंतु सिव्हिल सर्जनने ही रजा देण्याचे साफ नाकारले. त्यावेळी जणू काय डॉ संतांची कर्तव्यनिष्ठाच पणास लावली गेली.
      डॉ संतांनी सर्व परिस्थिती आपल्या अर्जात लिहिली होती व आपली रजा मंजूर होण्यास आटोकाट प्रयत्न केले तरी सिव्हिल सर्जनने ती अमान्य केली , तेव्हा डॉ संत अर्जाच्या उत्तराची वाट न पाहता आपल्या वरिष्ठ अधिकार्यास आपल्या जाण्याची सूचना देऊन बिनधोक लग्नाच्या पार्टीबरोबर मुंबईस निघून गेले. हा त्यांचा गुन्हा अक्षम्य होता , म्हणूनच त्यांना नोकरीतून डिसमिस्स करण्यात आले आहे, असे त्यांच्या ऑफिसर ने त्यांना कळविले. त्यास त्यांनी उत्तर दिले कि मी नोकरी एवढ्यासाठी करतो कि मला कौटुंबिक जबाबदारी सांभाळता यावी. पण जेव्हा नोकरी माझ्या ह्या हेतूला विघातक होत आहे , तेव्हा हि नोकरी गेली तरी बेहत्तर , पण मी मुंबईस लग्न पार पाडण्याकरिता जाणारच. आणि थोड्या दिवसात लग्न कार्य व्यवस्थित पूर्ण करून डॉ संत पुन्हा नोकरीवर रुजू झाले.
      आल्यावर त्यांनी, इन्स्पेक्टर जनरल ऑफ सिव्हिल हॉस्पिटलकडे अपील केले व या नागपूरच्या सर्वोच्च अधिकाऱ्याने आपला निकाल डॉ संतांच्या बाजूने देऊन, सिव्हिल सर्जन बिलासपूर ला दोष दिला. त्यानंतर डॉ संत ने दोन वर्षे आणखी नोकरी केली व मग सन १९२४ मध्ये नोकरीचा राजीनामा देऊन आपला स्वतःचा दवाखाना काढून खाजगी प्रॅक्टिस करण्यास प्रारंभ केला.

(क्रमशः)

Thursday, 3 November 2016

उदार कल्पतरू अर्थात सद्गुरू चरित्र ...भाग ११ (b) ...

उदार कल्पतरू 
द्वितीय विवाहानंतर ... 
६... 

      डॉ संतांना द्वितीय विवाहापासून तीन पुत्र व एक कन्या प्राप्त झाले होते. प्रथम विवाहापासून एक पुत्र ज्याचे नाव - विनायक होते. ह्या सर्वांचे उच्च विश्वविद्यालयीन शिक्षण त्यांनी पूर्ण केले. ज्येष्ठ पुत्र विनायक हा मुंबई हुन M.B.B.S. पास करून डॉक्टर झाला होता व त्याचा विवाह सौ उषा B.A. भूतपूर्व डिस्ट्रिक्ट जज श्री अंबर्डेकर यांची कन्या हिच्याशी झाला होता. त्याला मध्य प्रांतीय मेडिकल खात्यात नोकरी लागली होती. तो आपल्या उत्तम कर्तबगारीमुळे सिव्हिल सर्जन झाला व पुढे त्याला डायरेक्टर ऑफ पब्लिक हेल्थची जागा मिळाली. तो M.S.देखील झाला होता. सन १९५६ पर्यंत द्वितीय पुत्र गजानन , तृतीय पुत्र रघुनाथ व कन्या मालती ह्यांचे हि विवाह यथोचित रीतीने पार पाडले होते . फक्त कनिष्ठ पुत्र यशवंत, तो लहान असल्यामुळे त्याचे कॉलेज चे शिक्षण आणि विवाह हे करायचे राहिले होते.
      त्यांच्या बिलासपूरच्या सामाजिक कार्यात त्यांनी अनेक उल्लेखनीय लोकोपयोगी गोष्टी केल्या. पैकी व्यायामशाळा व महाराष्ट्राची शाखा ह्या फार प्रसिद्धीस आल्या. त्यांच्या परिश्रमाने बिलासपूर येथे छत्तीसगढ येथे मराठी साहित्य संमेलन उमरावतीचे नामांकित श्री बाबासाहेब खापर्डे ह्यांच्या अध्यक्षतेखाली यशस्वी रीतीने पार पडले. बिलासपूरच्या मराठी भाषिक मुलांच्या उन्नतीकरिता डॉ संतांनी हायस्कूल चे शिक्षण मराठी भाषेच्या माध्यमातून व्हावे हा परिश्रम करून प्रयत्न केला होता. तसेच मराठी माध्यमातून खाजगी मिडलस्कूलमधून शिक्षणाची व्यवस्था केली होती. ह्या कामासाठी एक प्रायव्हेट शाळा त्यांनी उघडली होती. त्यानुसार ते  प्रयत्न करीत होते. पण ह्या गोष्टीला स्थानीय मराठी भाषिक जनतेचाच बरोबर पाठिंबा नसल्यामुळे त्यांचा मनोदय असफलच राहिला.
      डॉ संतांचे नाट्यकलेचे प्रेम हे त्यांच्या बिलासपूर सारख्या मागासलेल्या शहरातील वास्तव्याचे व त्यातून त्या कलेला  जनतेला उच्च स्थान मिळवून देण्याचे प्रतीक आहे. त्यांच्याच प्रयत्नाने तेथील मराठी व इतर जनतेमध्ये मराठी नाटकांविषयी व नाट्यकलेबद्दल आदर व प्रेम निर्माण झाले. ते स्वतः उत्तम दिग्दर्शक व अभिनयकुशल नट होते. 'भाऊबंदकी', ' म्युनिसिपालिटी' , 'सोन्याचा कळस' , ' लग्नाची बेडी ' , 'घराबाहेर ' , ' उद्याचा संसार' , इत्यादी प्रख्यात नाटके तेथील तरुण मंडळींना हाताशी घेऊन त्यांचे प्रयोग करून तेथील मंडळींना त्यांच्या बिलासपूरच्या वास्तव्यात दाखविले होते.
      अनेकांना हे ठाऊक नसेल कि, डॉ संत हे मराठीतील एक उत्तम कवी हि आहेत. त्यांना भावस्पर्शी व निसर्गवर्णनपर कविता करण्याचा छंद लहानपणापासूनच आहे. एवढेच नव्हे तर , हिंदी त्यांची  मातृभाषा नसून देखील ते ह्या भाषेतून सुद्धा उत्तम काव्यरचना करतात तसेच, ते हिंदीत व्याख्यानेही देतात. ते हिंदी काव्यगायक आहेतच, पण ते भारतेंदु सभेचे एक प्रमुख सभासद होते. श्री प्र.के. अत्रे यांच्या 'लग्नाची बेडी' या नाटकाचे हिंदी भाषेत 'लग्न शृंखला' म्हणून भाषांतर केले आणि याचे प्रयोग रायपूर आणि बिलासपूर शहरी करून त्यांनी रेडक्रॉस फंड यात उदारपणे हजारो रुपयांची मदत केली.

(क्रमशः)

Sunday, 30 October 2016

उदार कल्पतरू अर्थात सद्गुरू चरित्र ...भाग ११ (a) ...

उदार कल्पतरू अर्थात सद्गुरू चरित्र
द्वितीय विवाहानंतर

      इ स १९२० डिसेंबर ला डॉ संतांची फिरती नोकरी संपून त्यांची नेमणूक बिलासपूर येथील तुरुंग व पोलीस हॉस्पिटल मध्ये मेडिकल ऑफिसर म्हणून झाली. इ.स. १९२२ मध्ये त्यांच्या जीवनात एक महत्वाची घटना घडली - ती म्हणजे , त्यांच्या मामे बहिणीशी त्यांच्या हस्ते माझा विवाह मुंबई येथे २० मे १९२२ मध्ये झाला. तिचे नाव सौ चंद्रिका ठेवण्यात आले आणि विज्ञान जनात तिला आज फार महत्वाचे स्थान आहे.
      इ स १९२० पासून १९५६ पर्यंत  सर्व जीवन बिलासपुरताच व्यतीत झाले. सन १९२४ मध्ये त्यांनी सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन बिलासपूरलाच खाजगी प्रॅक्टिस सुरु केली. त्यावेळी त्यांच्या सर्व हितचिंतकांनी ह्या गोष्टीस मोडता घातला कारण,  बिलासपूर सारख्या मागासलेल्या गावी ह्यापूर्वी ज्या काही डॉक्टरांनी खाजगी दवाखाने घातले होते ते २-४ महिन्यातच गुंडाळून त्यांना आपले चंबूगबाळे आवरावे लागले होते. कारण तो प्रांत व जिल्हा जवळ अत्यंत मागासलेला होता. जनतेस इंग्रजी औषधे वापरण्याचा सराव नव्हता. परंतु डॉ संतांनी एकदा केलेला निश्चय मागे घेतला नाही. सरकारी नोकरी सोडून खाजगी दवाखाना घालून जीवन व्यतीत करण्याचा पक्का निश्चय होण्याचे कारण हेच होते कि , सरकारी नोकरीत नेहेमी बदल्या होत असत . त्यांच्या मातोश्रींची प्रकृती नेहेमीच उदार विकाराने त्रस्त असे , वडिलांचे हि वय होत चालले होते. मातृसेवा व पितृसेवेचे ध्येय सरकारी नोकरीत राहून सिद्ध होणे फार कठीण असे. म्हणून एकाच ठिकाणी राहून आपल्या व्यवसायाने त्यांची सेवा घडावी - हाच नोकरीचा राजीनामा देण्यामागील उद्देश होता.
      बिलासपूर हे शहर डॉ संतांसारख्या पुण्यामुंबईकडील महाराष्ट्रीयास आपले नित्याचे व्यवसाय स्थान बनविणे , पसंत पडण्यासारखे नव्हते. पाण्याचे नळ , विजेचा प्रवाह, मोटारीची रहदारी इत्यादी आधुनिक सुखसोयी त्या वेळी तिथे नव्हत्या. तेथील महाराष्ट्रीय म्हणविणारी जनता, छत्तीसगडी जनतेच्या मानाने अतिशय अल्प प्रमाणात होती आणि त्यांच्यात महाराष्ट्रीयत्वाचा अभिमान व संस्कृतीही मुळीच नव्हती. त्यांना शुद्ध मराठी बोलता येत नसे. हिंदी मिश्रित नागपुरी बोलीत ते मराठी बोलत असत. त्यांची सोदाहरण व्यवहाराची भाषा बहुतांशी हिंदी च असे. खाजगी डॉक्टरी व्यवसाय सुरु करणाऱ्या डॉक्टरांना तिथे अपयश येत असे. अशा प्रकारचा बिलासपूरचा इतिहास प्रसिद्ध होता.
      डॉ संतांचा स्वभाव मुळात प्रवाहपतित होण्याचा नव्हता, पण प्रतिकूल परिस्थितीशी झुंज देऊन तिला स्वतःच कर्तबगारीने अनुकूल बनविण्याचा त्यांचा स्वभाव असल्यानेच , त्यांनी बिलासपूर हे शहर खाजगी व्यवसायाकरिता निश्चित केले. दुसरे कारण म्हणजे त्यावेळी, बिलासपूरमध्ये अन्नधान्याची स्वस्ताई कमालीची असे. त्यांच्या जवळ धनसंचय फार थोडा होता. महाराष्ट्रातील इतर शहरात व्यवसाय त्यांनी सुरु केला असता तर , तो जमवून कुटुंब पोषणास पुरेशी मिळकत होई पर्यंत पुरेल , इतका धनसंचय त्यांच्याजवळ नव्हता. म्हणून स्वस्ताई असलेले बिलासपूर  - पण आप्तांपासून दूर त्यांनी मातृसेवा व पितृसेवेच्या ध्येयाने पसंत केले. नोकरीच्या निमित्ताने जवळ जवळ ३ वर्षे त्यांना  बिलासपूरी राहण्याची संधी मिळाली. तुरुंग व पोलीस खात्यातील डॉ म्हणून त्यांना खाजगी प्रॅक्टिस करता येत नव्हती तरी शहरातील महाराष्ट्रीय व इतर  त्यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे डॉक्टर ह्या नात्यामुळे येत असे. म्हणून बिलासपूरलाच प्रॅक्टिस सुरु करण्याचा हा निश्चय त्यांनी त्यांनी पक्का केला आणि १९२४ मध्ये त्यांनी खाजगी दवाखाना उघडला.
     पहिल्या ६ महिन्यांचे त्यांचे उत्पन्न अत्यंत संतोषजनक ठरले. बिलासपुरास खाजगी डॉक्टरांचा उदरनिर्वाह होत नाही , ह्या  समजुतीला त्यांनी जबरदस्त धक्का दिला. त्यांचे डॉक्टरी धंद्यातले ज्ञान रोग्यांशी व रोग्याच्या कुटुंबातील माणसांशी आपुलकीने वागण्याची पद्धत , गरीब रोग्यांची विनामूल्य सेवा व त्यांचे उच्चनैतिक आचरण , सहानुभूतीयुक्त प्रेमळ स्वभाव इत्यादी उत्तम गुणांनी त्यांचा व्यवसाय दिवसेंदिवस भरभराटीचा  होऊ लागला . तो काही कालानंतर इतका वाढला कि सन १९२९ मध्ये त्यांनी आपले स्वतःचे भव्य घर प्रमुख रस्त्यावर बांधून तिथेच एक मोठा दवाखाना व घरातील सर्व मंडळींची राहण्याची सोय केली.
      डॉ संत दिवसरात्र आपल्या व्यवसायात गुंतलेले असले तरीही समाजकार्यात पुढे भाग घेत. रायगडला एका प्रसंगी महानदीला अचानक महापूर आला होता , त्यावेळी डॉ संत इतर समाज नेत्यांसह लोकांना मदत करण्यास व उपचारासाठी धावून गेले होते. पहिल्या जागतिक महायुद्धाच्या काळात देश सेवेच्या निमित्ताने मध्य प्रदेशातील डॉक्टर लोकांनी इंग्रजी सेनेत भरती होण्यासाठी प्रोत्साहन पर भाषणे देण्यासाठी डॉ संतांनी मध्य प्रांतांचा सर्व विभागांचा दौरा काढला. त्यांचे हे वागणे त्यावेळच्या मध्य प्रदेशच्या सरकारच्या लक्षात आल्यामुळे त्यांना "रावसाहेब" हा सन्माननीय 'किताब अर्पण करण्यात आला. बिलासपूर जिल्ह्याच्या रेडक्रॉस शाखेचे मंत्रिपद तेथील सिव्हील सर्जन व डेप्युटी कमिशनर ने त्यांच्याकडे सोपविले. रेडक्रॉसच्या २२ जिल्ह्यातील मंडळींची बिलासपूर ला डॉ  नेहेमी ये जा असे. ऑल इंडिया मेडिकल प्रॅक्टिशनर्स डॉक्टर्स अससोसिएशन च्या मध्य प्रांतीय शाखेचे अध्यक्ष स्थानी ते निवडून  होते. सण १९३२ ते १९५६ पर्यंत ते अध्यक्षपद त्यांच्याकडेच होते. त्याचप्रमाणे मध्यप्रांतीय मेडिकल एक्झामीनेशन बोर्ड , मध्यप्रांतीय नर्सेस असोसिएशन, रेडक्रॉस कमिटी इ. अनेक मेडिकल संस्थेतून ते काम करत असत व आपली खाजगी प्रॅक्टिस सांभाळून अनेक प्रकारची राष्ट्रउपयोगी व जनकल्याणकारी कार्ये तन ,मन ,धन अर्पून करत असत. ह्या सर्व कामानिमित्ताने त्यांना नागपुरास यावे लागले तरी हे सर्व ते अतिउल्हासाने व प्रेमाने करत असत.
      डॉ संतांची मेडिकल प्रॅक्टिस वरच्या स्तराची असे. शास्त्रात लागणाऱ्या नित्य नवीन शोधांचे ज्ञान असावे म्हणून त्यांनी स्वतःची लायब्ररी अगदी अपटुडेट मेडिकल पुस्तकांनी संग्रहित केली होती. ह्या सर्व पुस्तक संचयाची किंमत पाच हजार रुपयांहून अधिक जास्त होती. ते, रोगाचे निदान - रक्त , मूत्र, लघवी , थुंकी, मल इ.ची परीक्षा आणि तपास मायक्रोस्कोप ने करून निश्चित करत असत. त्यावेळच्या बिलासपूरच्या कोणत्याच खाजगी डॉक्टर जवळ अश्या प्रकारच्या तपासणी करण्याची साधने नव्हती, म्हणून इतर डॉक्टर त्यांच्या लॅबोरेटरीचा उपयोग करून घेत असत व त्यांना consult करीत असत. त्यावेळेला अश्या प्रकारची तपासणीची साधने पूर्णतः सरकारी दवाखान्यातूनही नसत , म्हणून डॉ संत आपली लॅबोरेटोरी सर्व साधनसामुग्रीने परिपूर्ण ठेवून चालवीत असत.  तपासणीबद्दलचे मूल्य त्यांना साधारण रोग्यांकडून क्वचितच प्राप्त होत असे. तरीपण सर्व प्रकारच्या परीक्षा व आवश्यक तपासणीत ते भेदभाव न करता पूर्णतः करत असत.
तात्पर्य, हे कि त्यांचे नाव उत्तम चिकित्सक वैद्य व उत्तम नेत्र शल्य चिकित्सक म्हणून दिवसेंदिवस वाढू लागले . त्याच प्रमाणात संपत्ती व कीर्तीची व कुटुंबाचीही वृद्धी होत गेली.


(क्रमशः ) 



     
      

Wednesday, 26 October 2016

उदार कल्पतरू अर्थात सद्गुरू चरित्र ...भाग १० ...


मॅट्रिक नंतर 

लेखक :- श्री दी या मार्डीकर 

      माणसाच्या जीवनात काही  घटना अशा घडतात कि त्यामुळे त्याचे पुढचे आयुष्य अचानक वेगळेच वळण घेते. त्याच प्रमाणे मॅट्रिक ची परीक्षा १९१३ मध्ये पास झाल्याने पुंडलिकाचे पुढील जीवन सर्वस्वी बदलले हे  मात्र खरे. त्याच्या वडिलांना आनंद झाला . अर्थात तो आनंद अवर्णनीय असा होता.
      हरिभाऊंचे मासिक उत्पन्न जेमतेमच होते व वाढत संसार होता. ३ मुली शाळेत शिकत होत्या व त्यांचे वय लग्नाचे होत चालले होते. त्यांच्या अतिशय स्वाभिमानी स्वभावामुळे आणि पुंजीपती मालकाच्या लहरीपणामुळे त्यांची नोकरी कधीही एके ठिकाणी कायमची टिकत नसे.  तरी पण इतक्या हिरीरीने व अविश्रांत श्रम घेऊन, मॅट्रिक पास होणाऱ्या पुंडलिकास त्याच्या मनासारखे विश्वविद्यालयीन उच्च शिक्षण  देण्याचा  त्यांनी आपला मनोनिग्रह  सांगून,त्याला पुढच्या शिक्षणाची विचारणा केली. पुंडलिकाने काही आपल्या मित्रांच्या सल्ल्याने वैद्यकीय शिक्षणाची निवड  केली. त्याकरिता मुंबई च्या ग्रांट मेडिकल कॉलेज मध्ये त्यावेळच्या एल. एम अँड एस च्या डिग्री कोर्से मध्ये प्रविष्ट होण्याचे पुंडलिकाने ठरवावे , असे हरिभाऊंचे मत होते. परंतु कुटुंबाची इतर जबाबदारी लक्षात घेऊन सतत ५ वर्षे दरमहा रु १००/- खर्च होतील, या कारणामुळे पुंडलिकाने मुंबई चे हे शिक्षण  घेण्याचे नाकारले. हरिभाऊंनी  अनेक रीतींनी त्याची समजूत घालून पहिले व सांगितले कि, यासाठी त्यांच्या मिळकतीचा अर्धा हिस्सा जरी खर्च झाला तरीही  हरकत नाही. ५ वर्षे गरिबीत काढून पुंडलिकाचे शिक्षण पूर्ण करण्याचे  ठरवले . परंतु पुढे येणार असणाऱ्या धाकट्या बहिणीचा  लग्नाचा विचार करून , पुंडलिकाने स्पष्ट सांगून टाकले कि, वडिलांचा उदारपणाचा फायदा घेऊन सर्व कुटुंबास दीर्घ आर्थिक अडचणीत ठेवण्यास मी कधीही तयार होणार नाही. म्हणून त्याने ह्या गोष्टीस साफ नकार दिला.
      परंतु सुदैवाने त्याच वर्षी सन १९१४ मध्ये नागपुरात नव्यानेच स्थापन झालेल्या रॉबर्टसन स्कूल मध्ये पुंडलिकास प्रवेश मिळाला. ह्या एल. एम. पी च्या वैद्यकीय शिक्षणात हरिभाऊंचा विशेष खर्च ही झाला नाही. कारण विद्यार्थ्यांना ४ वर्षेपर्यंत दरमहा रु १२ शिष्यवृत्ती व अभ्यासाची सर्व पुस्तके सरकारी खर्चाने मिळत असत. त्याशिवाय शरीर शास्त्र (anatomy) व शरीर स्वास्थ्य शास्त्र   (physiology) ह्या विषयांचे नकाशे   (Diagrams)  चित्रित करून ते शाळेला विकून पुंडलिक द्रव्य मिळवत असे. १९१८ सालच्या अंती येथील ४ वर्षाचा मेडिकल शिक्षण क्रम पूर्ण करून त्याने त्याच वर्षांपासून मध्य प्रांतीय सरकारी वैद्यक खात्यामध्ये दरमहा ४५ रु  सब - अससिस्टन्ट सर्जन ची नोकरी मिळवली. पहिल्या ३ वर्षे पावेतोची नोकरी अत्यंत हाल अपेष्टांची अशीच होती. संसर्गजन्यक रोगप्रतिबंधक खात्यातील त्या नोकरीत नित्य प्रवास करावा लागेच पण, मध्य प्रदेशाच्या त्या वेळच्या २२ जिल्ह्यात जेथे जेथे प्लेग , कॉलरा इत्यादि रोगांचा प्रसार होत असे त्या ठिकाणी पुंडलाकीची म्हणजे डॉ पुं ह संत यांची बदली होत असे. बुलढाणा अकोला यवतमाळ रायपूर मंडला सागर इत्यादी जिल्ह्यातील गावोगावी बदली होत असे आणि खेड्यापाड्यातून बैलगाडीतून  कुठल्याही अवेळी प्रवास करावा लागत असे. स्वतःची  व अतिशय परिश्रमी डॉक्टर म्हणून पुंडलिकाची ख्याती पसरली होती. या कारणामुळे केंद्रीय खात्याकडून इतर डॉक्टर उपलब्ध असतांनाही डॉ संत यांचीच नेमणूक होत असे.
      डॉ संत यांचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच त्यांना ता १८ जुलै १९१७ ला  झाले होते. त्याचे नाव विनायक ठेवले होते. डॉ संत ची नोकरी सुरुवातीस फिरतीची असल्याने त्यांना आईवडील पत्नी व पुत्र ह्यांच्यासह कौटुंबिक सहवासात राहण्याची संधीच  मिळाली नाही,ते रायपूर जिल्ह्यात जंगलातील फिरतीच्या नोकरीवर असतांना  अत्यंत दुःखदायक प्रसंग ओढवला. त्यांचे वडील मलकापूर येथे इंजिनीअर असतांना १९१८ च्या भारतव्यापी इन्फ्लुएंझा च्या प्राणघातक साथीत त्यांचे कुटुंब सौ दुर्गादेवी सापडल्या व त्याला बळी पडले. पत्नीच्या स्वर्गवासाची हि बातमी तारेने कळताच ते घाईने स्वगृही परतले, परंतु आपल्या धर्मपत्नीचे अंतिमदर्शन म्हणजे तिच्या शवाचे दर्शनच त्यांच्या नशिबी लिहिले होते. या दुःखाच्या जबरदस्त आघाताने त्यांचे जीवनातील सर्व लक्षच उडाले. तेव्हा  विनायक हा अवघा ६ महिन्यांचा होता. त्याला टाकून  स्वर्गवासी झाली होती आणि आपल्या नातवाचे  कार्य हरिभाऊ व सौ यमुनाबाई ह्या आजोबा आजीवर येऊन पडले. तो असहय्य दुःखहाभार हृदयाशी बाळगून डॉ संत पुन्हा नोकरीवर हजर झाले.
      रायपूरच्या निर्जन भयानक जंगलातील खेड्यापाड्यातून इन्फ्लुएंझा च्या रोगावर उपचार करीत करीत ते हिंडत असत व सभोवार माणसे कुत्र्यामांजरासारखी मरत असत. डॉ संत हिरीरीने त्यांच्यावर उपाय करून त्यांची शुश्रूषा करत असत. इच्छा एकाच कि  सर्वस्व हरपल्यामुळे , इतर रोग्यांप्रमाणे ईश्वराने आपल्यालाही घेऊन जावे. परंतु ईश्वर संकेत निराळाच असल्याने त्यांना कधीही अपाय झाला नाही. त्याच वेळी जगातले १ले महायुद्ध सुरु झाले होते. डॉ  युद्धाच्या आघाडीवर जाण्याकरिता सैन्याच्या डॉक्टरी  विभागात अर्ज केला. हि गोष्ट त्यांच्या एका मित्राला समजताच , त्यांनी ती मालकापुरास त्यांच्या वडिलांना  कळवली. वडिलांकडून तातडीचे बोलावणे येताच , ते घरी गेले. त्यांच्या घरी त्यांच्या मातोश्री इत्यादिकांस इन्फ्लुएंझाचा तडाखा बसला होता. सर्वांनी डॉ संतांची मनधरणी करून युद्धावर न जाण्याचा आग्रह केला. डॉ संतांचे नाव पुंडलिक होते व त्या पुंडलिक भक्ताप्रमाणे स्वभावाने ते परममातृभक्त होते. मातेच्या मनाविरुद्ध न  वागण्याचे वाचन त्यांनी दिले. याचा परिणाम असा झाला कि त्यांना आपल्या मनाविरुद्ध द्वितीय विवाहाच्या बंधनात पडावे लागले. सन १९१९ मध्ये पुण्याच्या मोरोबादादाच्या वाड्यात त्यांचा विवाह  प्रसिद्ध ह. भ.प  श्री लक्ष्मण रामचंद्र पांगारकर यांच्या द्वितीय कन्या श्रीमती शांताबाई यांच्याशी मोठ्या थाटामाटाने पार पडला.

(क्रमशः )